
ग्रीन रिफायनरीसाठी ग्रामस्थांचा विरोध लक्षात घेता विविध समिती या विषयात लक्ष घालताना दिसत आहेत. बहुतांश समित्यांनी प्रकल्पाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे चांगला जमिनीचा मोबदला ग्रामस्थांना दिला तर प्रकल्पाला विरोध मावळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर शिवसेना आमदार राजन साळवी यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांचे शिष्ठमंडळ मंत्रालयात विविध मागण्या घेवून येत्या सोमवारी जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
काही दिवसापूर्वी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पग्रस्तांना मिळणारे जमीन दर, आणि सर्व सोयीसुविधांप्रमाणेच सर्व लाभ रिफायनारी प्रकल्पग्रस्तांना मिळतील असे सूतोवाच केले होते. उद्योगमंत्री हे शिवसेनेचे आहेत. मात्र स्थानिक शिवसेना ग्रामस्थाबरोबर आहे. ग्रामस्थांना हा प्रकल्प नको हवा असेल, तर शिवसेनेचाहि या प्रकल्पाला विरोध असेल असे साळवी यांनी स्पष्ट केले आहे. तसेच या रिफायनरी प्रकल्पाविरोधातल्या आंदोलनात शिवसेनाही सहभागी झाली होती. पण सध्या स्थानिकांचा एक गट हा प्रकल्पाच्या बाजूने तर दुसरा गट विरोधात आहे. त्यात आता काही शेतकऱ्याना नोटीस आल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात हे प्रकरण आता कोणतं वळण घेतं हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे.