रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी): रत्नागिरी शहरातील अनधिकृत बांधकामांवर रत्नागिरी नगर परिषद प्रशासनाने हातोडा फिरवण्यास सुरुवात केली आहे. आज सकाळी मारुती मंदिर परिसरातील काही अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली. परिषदेच्या कारवाईमुळे अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
रत्नागिरी शहरातील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा गेले काही दिवस ऐरणीवर आला आहे. शहरात अनेक ठिकाणी नगर परिषदेच्या जागेवर अनधिकृत बांधकामं करण्यात आली आहेत. हि अनधिकृत बांधकामं पाडावीत अशी मागणी गेल्या दिवसांमध्ये होत होती. अखेर आजपासून या कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. आज सकाळी शहरातल्या मारुती मंदिर परिसरातील काही अनधिकृत दुकानं पाडण्यात आली. शहरातील छत्रपती शिवाजी स्टेडिअमला लागूनच हि अनधिकृत बांधकामं करण्यात आली होती. आज सकाळी नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला होता. त्यानंतर जेसीबीच्या साहाय्याने हि अनधिकृत बांधकाम तोडण्यात आली. दरम्यान हि कारवाई पारदर्शक व्हावी आणि शहरातील सर्वच अनधिकृत बांधकामं नगर परिषदेने पाडावीत अशी मागणी आता होऊ लागली आहे.