
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात सध्या दररोज कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. बुधवारी रात्री जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये आणखी 12 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. तर मुंबईत स्वाब चाचणी करून बुधवारी जिल्ह्यात आलेल्या एका व्यक्तीचा कोरोना अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 196 वर पोहोचली आहे. विशेष यातील सहा रुग्ण वगळले तर बाकीचे रुग्ण हे 2 मे पासून पुढे सापडले आहेत. म्हणजे गेल्या 27 दिवसांत एकूण 190 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत.
जिल्ह्यात सध्या सातत्याने कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. बुधवारी रात्री जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये आणखी 12 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. नव्याने सापडलेले रुग्ण रत्नागिरीतील 6, कळंबणी रुग्णालयात स्वाब घेतलेलं 3 आणि राजापूर येथील 3 आहेत.
दरम्यान 30 वर्षीय एक इसम काल(बुधवार) मुंबई येथून रत्नागिरीत आला. प्रवास दरम्यान त्याला मुंबईत नायर रुग्णालयात केलेल्या तपासणीचा अहवाल प्राप्त झाला. तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे हा इसम थेट जिल्हा रुग्णालयात येऊन दाखल झाला आहे . यामुळे आता जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 196 झाली आहे. दरम्यान कोरोनामुळे जिल्ह्यात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आता सध्या जिल्ह्यात 108 कोरोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.