
रत्नागिरी, 8 मे : लॉकडाऊनमुळे रत्नागिरी जिल्ह्यात अडकलेल्या परजिल्ह्यातील नागरिकांसाठी आज विशेष बस सोडण्यात आल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातून आज सहा बसेस सोडण्यात आल्या.
लॉकडाऊनमध्ये रत्नागिरी जिल्हयात अडकलेल्या नागरिकांनी आपल्या जिल्ह्यात जाण्यासाठी विनंती अर्ज केले होते. प्राप्त अर्जातील पहिल्या टप्प्यातील मंजूर अर्जांनुसार नागरिकांना या गाडयांमधून विविध जिल्हयांमध्ये जाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातून आज सहा बसेस सोडण्यात आल्या. रत्नागिरी बसस्थानकातून रायगड आणि सिंधुदुर्गसाठी दुपारी बस सोडण्यात आल्या. त्याशिवाय चिपळूण बस स्थानकातूनही सिंधुदुर्ग आणि रायगडसाठी बस सोडण्यात आल्या. तसेच दापोली बस स्थानकातूनही रायगडसाठी बस सोडण्यात आली तर लांजा बस स्थानकातून सिंधुदुर्गसाठी बस सोडण्यात आली या प्रत्येक बसमधून सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळून फक्त 22 प्रवासी पाठविण्यात आले. दरम्यान, आपल्या गावी जाण्यासाठी या नागरिकांची लगबग दिसून येत होती. प्रत्येकाने मास्क वापरले होते. तसेच एसटी विभागाकडून पाणी, जेवण व बिस्कीटपुडा या प्रवाशांना देण्यात आला.
दरम्यान शनिवारी देखील सिंधुदुर्ग, रायगड, बुलढाणा, लातूर, सातारा, भंडारा या जिल्ह्यांसाठी 16 बसचं नियोजन करण्यात आलं आहे. तर रविवारी गोंदिया, अमरावती या जिल्ह्यांसाठी तीन बसेस जिल्ह्यातून सोडण्यात येणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांनी दिली.