रत्नागिरी, प्रतिनिधी : रत्नागिरी जिल्ह्यात गेले काही दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. या पावसामुळे सध्या रत्नागिरी जिल्ह्यात असलेल्या 46 धरणांपैकी 30 धरणं 100 टक्के भरली आहेत. तर 16 धरणं 50 टक्के पेक्षा जास्त भरली आहेत.
जिल्ह्यात गेले काही दिवस पावसाची संततधार सुरू आहे. समाधानकारक पावसामुळे शेतीच्या कामांनाही वेग आलेला आहे. तसेच धरण क्षेत्रातही पाऊस चांगलाच बरसत असल्याने 30 धरणं 100 टक्के भरली आहेत.
विशेष म्हणजे पावसाचा पहिला महिना संपण्याआधीच हि धरणं भरली आहेत. उर्वरीत 16 धरणं ही 50 टक्क्यांपेक्षा अधिक क्षमतेने भरली आहेत. यामध्ये मंडणगड तालुक्यातील 2, दापोलीतील 3, खेड मधील 6, चिपळूणमधील 7, गुहागरमधील 1, संगमेश्वरमधील 4, रत्नागिरीतील 1, लांजा तालुक्यातील 3, राजापूरमधील 3 अशी जिल्ह्यातील 30 धरणं 100 टक्के भरली आहेत.
दरम्यान रत्नागिरी जवळचं शीळ धरण 100 टक्के भरलं आहे, या धरणाच्या सांडव्यावरून धरणाचं पाणी ओसंडून वहातंय. त्यामुळे इथला नजारा पहाण्यासारखा आहे.
कोणती धरणं 100 टक्के भरली
मंडणगड – पणदेरी, चिंचाळी
दापोली – सोंडेघर, सुकोंडी, पंचनदी
खेड – शिरवली, शेलडी, पिंपळवाडी, तळवट, कोंडीवली, कुरवळ
गुहागर – गुहागर
चिपळूण – फणसवाडी, मालघर, कळंवडे, अडरे, खोपड, मोरवणे, आंबतखोल
संगमेश्वर – तेलेवाडी, कडवई, गडनदी, गडगडी,
रत्नागिरी – शिळ
लांजा – व्हेळ, गवाणे, मुचकुंदी,
राजापूर – ओझर, गोपाळवाडी, वाटूळ