
रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकिसाठी शहर विकास आघाडीने कंबर कसली आहे. शिवसेनेला टक्कर देण्यासाठी आघाडीकडून माजी नगराध्यक्ष मिलिंद किर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आज पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. किर हे यापूर्वी शिवसेनेत होते, मात्र आता त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकला आहे.
रत्नागिरी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी पक्षातील तडजोडीनुसार नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे निवडणूक होणार हे नक्की आहे. त्यासाठी विरोधकांनी तयारी सुरू केली आहे. नगराध्यक्ष पदाच्या या पोट निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे, बहुजन समाज पार्टी, वंचित आघाडी, आरपीआय गवई गट व महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष एकत्र आले असून त्यांनी शहर विकास आघाडी स्थापन केली आहे. या शहर विकास आघाडीचे उमेदवार म्हणून माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे.
शिवसेनेला बहुमत असताना देखील स्वःताच्या सोयीसाठी जनतेवर पोट निवडणूक लादली जात आहे. यावरून जनतेला गृहीत धरलं जात असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे.शहराला विकासाच्या दृष्टीने मागे लोटणाऱ्या आणि नगर परिषदेला खड्ड्यात घालणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेच्या उमेदवाराला या निवडणुकीत पराभूत करणारच,असा विश्वास शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मिलिंद कीर यांनी आज शहर विकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
सहा पक्ष एकत्र येऊन झालेली आघाडी ही वज्रमूठ आहे, आम्ही ठोसा हाणणार आणि सेनेच्या उमेदवाराला पराभूत करणार असा विश्वास व्यक्त करत आजच आपण शिवसेना पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा पक्षप्रमुखांकडे फॅक्सवर पाठवून दिल्याचे किर यांनी सांगितले.आपण आघाडीतर्फे नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याचे त्यानी स्पष्ट केले सध्याच्या नगरपरिषदेमधील सत्ताधाऱयांनी नगरपरिषदेला खड्ड्यात घातल्याचा आरोपही त्यांनी केला .सन 2012 नंतर सव्वा वर्षाच्या माझ्या नगराध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत त्यावेळी तब्बल 35 कोटींचा आर्थिक बोजा पालिकेवर होता.त्यातून बाहेर पडण्यासाठी मी प्रयत्न केले.शहराचा पुढील 30 वर्षाचा विचार करून १८५० कोटींचा डीपीआर तयार केला.त्यानंतरच्या काळातील अशोक मयेकर,महेंद्र मयेकर यांनी पाठपुरावा करून डीपीआर ला मंजुरी मिळवली.६२ कोटींची नळपाणी योजना हीसुद्धा त्याचाच एक भाग आहे.२०१६ पासून आतापर्यंत पालिकेला ५५८ कोटी विविध योजनांसाठी यायला हवे होते.मात्र ते येऊ शकले नाहीत.याचं मुख्य कारण म्हणजे सत्ताधाऱ्यांची तशी मानसिकताच नाही.फक्त खुर्चीवर बसायचं आणि झालेलं आहे त्याच्यावर जगायचं असच चाललेलं आहे, असा आरोपही कीर यांनी यावेळी केला. नगरपालिकेच्या कामात आमदार उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांची सुद्धा ढवळाढवळ चालते. अनेक कामांच्या मंजुरीसाठी त्यांना विचारावे लागते, असाही कीर यांनी आरोप केला.
यावेळी राष्ट्रवादीचे कुमार शेटय़े ,बशीर मुर्तूझा, केतन शेटय़े, राकेश चव्हाण आदी आघाडीचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते.