मुंबई : राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय म्हणजे इतिहासाचा साक्षीदार आणि भविष्याची ऊर्जा आहे. या संग्रहालयामुळे प्राचीनतेचा मान, इतिहासाची जपणूक होण्याबरोबरच नवीन पिढीपर्यंत सिनेमाचा इतिहास पोहोचण्यासाठी एक नवे माध्यम उपलब्ध झाले असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले.पेडर रोड येथील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धन राठोड, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, खासदार अरविंद सावंत, खासदार राहुल शेवाळे, मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांच्यासह राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय सल्लागार समितीचे अध्यक्ष प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल आणि सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी उपस्थित होते.प्रधानमंत्री यावेळी म्हणाले, सिनेमा आणि समाज हे एकमेकांचे प्रतिबिंब आहेत.जे आपल्याला समाजात दिसते ते आपल्याला सिनेमात दिसते तसेच जे आपण सिनेमात पाहतो ते आपल्याला समाजात घडताना दिसते. आज भारताच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून कलाकार पुढे येत असून हे कलाकार आपली कलाकृती समोर आणत आहेत. आजचा समाज बदलत असून बदलत्या समाजाचा सिनेमा हा आरसा आहे, सिनेमातून जसे प्रश्न कळतात तशी उत्तरेही मिळतात. पूर्वीच्या काळी एखादा सिनेमा बनविण्यासाठी किती वर्ष लागली यावरून त्याची ओळख व्हायची आता मोठमोठे सिनेमे कमीत कमी वेळात पूर्ण होतात यावरून आपण नवीन तंत्रज्ञान आत्मसात केले आहे हे कळून येते. जेव्हा चांगली कला आणि कलाकार एकत्र येतात तेव्हा चांगल्या कलाकृतींची निर्मिती होते असे मला वाटते. सध्याचा काळ हा सामाजिक माध्यमांचा काळ असल्याने कलाकारांनी आपण करीत असलेले काम, परिश्रम लोकांसमोर मांडल्याने या क्षेत्रात येणाऱ्या नवीन पिढीला प्रेरणा मिळेल. आज वेगवेगळ्या विषयावर आत्मचरित्रपट बनत असताना विज्ञान, प्रयोगावर आधारित सिनेमा बनणे आवश्यक आहे.भारतामध्ये चित्रपट ही संस्कृती आहे. चित्रपट जतन आणि संवर्धन ही काळाची गरज आहे. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय हे चित्रपट चळवळीचे महत्त्वाचे केंद्र असून या संग्रहालयाद्वारे चित्रपटाचे जतन करण्याबरोबरच समाजाचेच दस्ताऐवजीकरण करण्याचे महत्त्वूपर्ण काम होत आहे. चित्रपट जतनासाठी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय करत असलेले प्रयत्न नक्कीच महत्त्वाचे आहेत.आज संपूर्ण भारतात जितके बॅटमॅनचे फॅन आहेत तितकेच बाहुबलीचे फॅन आहेत यावरून भारतीय कलाकारांना, कलाकृतींना एक ग्लोबल ॲप्रोच आहे हे सिद्ध होते. सिनेमा हा मूकनायक म्हणजेच सायलेंट पॉवर आहे, यामध्ये एक वेगळीच ताकद आहे कारण सिनेमा मनोरंजन करण्याबरोबरच प्रबोधन, नवे विचार देखील प्रेक्षकांना देत असतो. हागणदारीमुक्त भारत, क्रीडा, महिला सक्षमीकरण यासारख्या अनेक महत्त्वपूर्ण विषयावर आज माहितीपूर्ण नवीन कलाकृती बनत असून या विषयावरील सिनेमांना चांगला प्रेक्षकवर्गही लाभत असल्याचे प्रधानमंत्री यावेळी म्हणाले.
- भारतातील सिनेमासाठी प्रथमच खास संग्रहालयाची निर्मिती
- 100 वर्षाच्या भारतीय सिनेमाच्या कारकिर्दीचे मूल्यांकन आणि विकास
- कलाकृती आणि संस्मरणांचा विस्तृत संग्रह
- पूर्णत: मुलांचा संवादात्मक चित्रपट स्टुडिओ
- गांधी आणि सिनेमा यावरील विशेष प्रदर्शनी