मुंबई : उन्नत शेती व समृद्ध शेतकरी या अभियानांतर्गत रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तेथील पडीक जमिनी लागवडीखाली आणण्यासाठी प्रयत्न करुन पायाभूत सुविधा उपलब्ध देणार असल्याचे गृहनिर्माण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश महेता यांनी सांगितले.
रायगड जिल्ह्यातील खरीप हंगाम 2017 संदर्भातील आढावा बैठक आज मंत्रालयात झाली. यावेळी महेता बोलत होते. बैठकीत खासदार श्रीरंग बारणे, आमदार अवधूत तटकरे, जिल्हाधिकारी शीतल तेली उगले, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष अदिती तटकरे आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील पडीक जमिनींपैकी लागवडीखाली असलेल्या जमिनीबाबत माहिती घेऊन महेता यांनी पडीक जमीन लागवडीखाली आणण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील या संदर्भातील अहवाल संबंधित विभागास सादर करण्यास सांगितले. तसेच बी-बियाणे खरेदी विक्री संदर्भात शेतकऱ्यांच्या तक्रारींची नोंद घ्यावी व संबंधितांवर कारवाई करण्या संदर्भातही महेता यांनी संबंधितांना सूचना दिल्या.