रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी) : टपाल खात्यात खाते उघडा अन शासकीय योजनांचा लाभ मिळवा, असे आवाहन भारतीय डाक आणि अनुगामी लोकराज्य महाअभियानतर्फे करण्यात आले आहे. येत्या मंगळवारी (ता.१०) याबाबत सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत रत्नागिरी बसस्थानकात प्रबोधन करण्यात येणार आहे.
टपाल खात्यातर्फे अनेक लोकोपयोगी योजना राबवल्या जात आहेत. केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या टपाल खात्यात आपली ठेव सुरक्षित राहू शकते. यामध्ये सुकन्या समृद्धी योजना, अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती बिमा योजना यासह अनेक योजनांचा समावेश आहे. सुकन्या समृद्धी योजना मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी बनवली आहे. 2-12-2003 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुलींच्या (जन्मतारखेपासून वयाच्या 10 व्या वर्षापर्यंत) नावाने पालक खाते उघडू शकतात. 1000 रुपये भरून खाते उघडता येते. त्यानंतर 100 च्या पटीत खात्यात रक्कम भरता येते. 18 वर्षे पूर्ण झाल्यावर उच्चतम शिक्षण, विवाहासाठी 50 टक्के रक्कम काढता येते. अटल पेन्शन योजना वृद्धावस्थेत सहाय्यकारी आहे. कमी गुंतवणूक अधिक लाभाची ही योजना आहे. 60 वर्षानंतर आपल्याला व आपल्याला मृत्यूनंतर जीवनसाथीला प्रतिमाह निश्चित पेन्शन राशी प्राप्त होईल. कमीत कमी पेन्शन लाभ ही सरकारची गॅरंटी आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना या दोन्ही योजना अनुक्रमे प्रत्येकी 12 व 330 रुपये प्रतिवर्षी भरल्यास विमा संरक्षण मिळते. या योजनांची अधिक माहिती व लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेण्यात येणार आहेत. बसस्थानकात होणार्या कार्यक्रमावेळी इच्छुकांनी आवश्यक कागदपत्रे घेऊन आल्यास त्यांना योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
अनुलोमतर्फे रत्नागिरी भागजनसेवक रवींद्र भोवड आणि टपाल खात्याचे विपणन अधिकारी गजानन करमरकर या योजनांची माहिती देणार आहेत. जास्तीत जास्त प्रवासी, नागरिक, विद्यार्थ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन अनुलोमचे रत्नागिरी- सिंधुदुर्ग उपविभाग जनसेवक स्वप्नील सावंत यांनी केले आहे.