मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक वर्षा निवासस्थानी आज पहाटे विठ्ठल आणि रूक्मिणीची महापूजा केली. राज्यातील बळीराजा सुखी होऊ दे, सकलजनांच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ दे, महाराष्ट्राच्या यशाची पताका उंच फडकत राहू दे, अशी मनोभावे प्रार्थना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी विठ्ठल-रुक्मिणी चरणी केली.
काही अपरिहार्य कारणास्तव श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री श्री. फडणवीस पंढरपूर येथे जाऊ न शकल्याने त्यांनी शासकीय निवासस्थानी महापूजा करून राज्यातील जनतेच्या सुखी जीवनासाठी विठ्ठल-रुक्मिणीला साकडे घातले. त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातील (ता. शेणगाव) भगवती या गावातील वर्षा जाधव व अनिल गंगाधर जाधव या शेतकरी दाम्पत्याने पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा केली याचा मला विशेष आनंद असल्याचे श्री. फडणवीस सांगितले.