
ज्येष्ठ पत्रकार संजीव साबडे यांच्या परवानगीने सदर लेख प्रकाशित. (पूर्वप्रसिद्धी : पुण्यनगरी)
2 डिसेंबर 1989. विश्वनाथ प्रताप सिंह यांनी या दिवशी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्याच दिवशी जनता दलाच्या चौधरी देवीलाल, इंदर कुमार गुजराल, अरुण नेहरू, अरुण सिंग, आरिफ मोहमद खान, मुफ्ती मोहमद सईद, जॉर्ज फर्नांडिस, मधू दंडवते, नथुराम मिर्धा, एम. एस. गुरूपादस्वामी, पी. उपेंद्र, मुरसोली मारन, राम विलास पासवान आदी नेत्यांचाही शपथविधी झाला. लगेच खातेवाटपही झालं. या नव्या मंत्र्यांनी आपापल्या कार्यालयांत जाऊन कार्यभार स्वीकारला. थोडक्यात, या मंत्र्यांचं काम सु्रू झालं. यातील काही जणांना आधी मंत्री म्हणून काम केल्याचा अनुभव होता, तर काही जण पहिल्यांदाच मंत्री झाले होते. त्यामुळे त्यांच्या राज्यातील कार्यकर्ते दिल्लीत येऊन आपापल्या मंत्र्याला भेटत होते, त्यांना पुष्पगुच्छ, शाली देत होते. सर्वांना जणू प्रेमाचं भरतं आलं होतं. थंडीमुळे दिल्लीतलं वातावरण अतिशय आल्हाददायक होतं.
पण काश्मीर खोरं मात्र शांत नव्हतं, ते धुमसत होतं. फारूक अब्दुल्ला मुख्यमंत्री होते. पण आजारपणामुळे ते उपचारासाठी परदेशात गेले होते. अशाच एके दिवशी, म्हणजे 8 डिसेंबर रोजी दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास एक तरुणी श्रीनगरच्या रुग्णालयातून घरी निघाली होती. डॉक्टर होती ती. ती मिनी बसमध्ये बसली. श्रीनगरच्या बाहेर नौगाम नावाचं गाव आहे. तिथं ती बस जाणार होती. बसमध्ये काही प्रवासी होते. ते मध्ये मध्ये उतरून निघून गेले. आता बसमध्ये उरले ती तरुणी आणि पाच तरुण. बस नौगामच्या दिशेने निघताच, त्या तरुणांनी ड्राइव्हरला नातीपोरा गावाकडे गाडी नेण्याचा आदेश दिला. बस तिथं गेल्यावर या तरुणांनी डॉक्टर तरुणीला खाली उतरवून एका मारुती कारमध्ये बसवलं आणि मग तिला नेलं सोपोरला. तिथं जावेद इकबाल मीर नावाच्या इंजिनीअरच्या घरी ते घेऊन गेले. हा मीर राज्य सरकारचा कर्मचारी होता.
त्या तरुणीला जे चौघे घेऊन गेले, त्यात जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट (जेकेएलएफ) चा नेता यासिन मलिक, गुलाम हसन आणि अशफाक हसन वणी आणि ज्याच्या घरी नेलं तो जावेद मीर होता. तोच कार चालवत होता. त्या तरुणीला तिथं नेल्यावर जे केएलएफच्या प्रवक्त्याने ‘काश्मीर टाइम्स’ दैनिकाच्या कार्यालयात फोन करून सांगितलं की आम्ही डॉ. रुबैय्या सईद हिचं अपहरणं केलं आहे. तुरुंगात असलेल्या आमच्या संघटनेच्या हमीद शेख आणि इतर चार जणांना सोडलं तरच आम्ही डॉ. रुबैय्या सईदची सुटका करू. या बातमीने आधी त्या वृत्तपत्र कार्यालयात, काश्मीर खोऱ्यात आणि मग संपूर्ण देशभर खळबळ माजली, कारण मुफ्ती मोहमद सईद यांची ती मुलगी होती. म्हणजे केंद्रीय गृहमंत्र्यांची कन्या. ती हॉस्पिटलमध्ये शिकाऊ डॉक्टर होती. काश्मिरी दहशतवाद्यांनी तिचंच अपहरण केलं होतं.

या बातमीमुळे काय काय घडलं हे नमूद करण्याआधी आणखी काही गोष्टींची माहिती असायला हवी. मुळात या दहशतवाद्यांनी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांच्या मुलीचं अपहरण करण्याचं ठरवलं होतं. पण त्यांच्या निवासस्थानी प्रचंड सुरक्षा असल्यानं त्यांनी ती योजना सोडली. मग विशेष पोलीस अधीक्षक अल्लाबक्ष यांच्या मुलीचं अपहरण करण्याचं ठरवलं. पण एकाने मुफ्ती मोहमद यांच्या मुलीच्या अपहरणाची सुचवलेली कल्पना सर्वांनाच खूप भावली.
रुबैय्या सईदच्या अपहरणाने केंद्र सरकार पार हादरलं. केंद्र सरकारने राज्याच्या पोलीस प्रमुखांना सूचना दिल्या की दहशतवादी चिडून रुबैय्याची हत्या करतील, असं कोणतंही पाऊल राज्य सरकारने उचलू नये. त्यासाठी या दहशतवाद्यांशी चर्चा सु्रू करण्याचा निर्णय झाला. मुख्य सचिव रजा मुसा आणि इंटलीजन्स ब्युरोचे ज्येष्ठ अधिकारी ए. एस. दुलत यांनी एका पत्रकारामार्फत अशफाक वणीच्या वडलांशी संपर्क साधला. एका गुप्त जागी त्यांची भेट घेतली. आधी वणी यांनी केंद्र सरकार काश्मीरवर अन्याय करत असल्यानं हे प्रकार घडत असल्याचा सूर लावला. हे चारही तरुण अजिबात वाईट नाहीत, ते तिला बहिणीप्रमाणे वागवतील, तिला हातही लावणार नाहीत, पण किमान हमीद शेखला सोडा, असंही त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना सांगितलं.
आता प्रयत्न सु्रू करायचे होते सुटकेचे. मात्र त्यासाठी दहशतवाद्यांना सोडण्याचे वाईट परिणाम होणार, हे केंद्र सरकारला माहीत होतं. बोलणी पुढे सरकत नव्हती. मुख्यमंत्री अब्दुल्ला काश्मीरमध्ये 13 डिसेंबरला परतले. त्यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेऊन अपहरण प्रकरणात पुढे काय घडलं हे विचारलं. तेव्हा मंत्र्यांनी सांगितलं की मुख्य सचिव आम्हाला काही सांगतच नाहीत. आम्हाला काहीच माहीत नाही. अब्दुल्ला यांनी रजा मुसा यांना बोलावून विचारणा केली, तेव्हा ते म्हणाले तुम्ही इथं नसल्यानं मी इतरांना माहिती दिली नाही. मी केंद्रात कॅबिनेट सचिव टी. एन. शेषन माहिती देत होतो.
त्याच वेळी मध्यस्थी करणारे माजी न्या. मोतीलाल कौल मुख्यमंत्र्यांना भेटले. त्या सर्व दहशतवाद्यांना सोडा, असा मुफ्ती मोहमद सईद यांचा निरोप त्यांनी देताच फारूक अब्दुल्ला संतापले. दहशतवाद्यांना सोडण्याचे काय परिणाम होतील, हे कळतं का, असं त्यांनी संतापून विचारलं. माझी मुलगी असती तरी मी दहशतवाद्यांची अशी सुटका केली नसती, असंही ऐकवलं. मग केंद्रीय गृहमंत्र्यांना फोन लावून सांगितलं की, तुमच्या मुलीच्या सुटकेसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. तुमच्या मुलीला काही होणार नाही, पण दहशतवाद्यांना सोडा, असा आग्रह तुम्ही करू नका.
त्यानंतर 13 डिसेंबर रोजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी अब्दुल्ला यांना फोन करून अतिरेक्यांना सोडा, असं सांगितलं. त्यावर अब्दुल्ला यांनी नाखुशी व्यक्त केली. हे बोलणं संपलं आणि सकाळी 11 वाजता इंदरकुमार गुजराल व आरिफ मोहमद खान हे दोन केंद्रीय मंत्री श्रीनगरला पोहोचले. आयबी प्रमुखही सोबत होते. त्यांची मुख्यमंत्र्यांची दोन तास चर्चा झाली. दहशतवाद्यांना सोडू नये, यावर अब्दुल्ला ठाम होते. पण पंतप्रधानांच्या सूचनेनुसार त्यांना पाच अतिरेक्यांची सुटका करावीच लागली. दुपारी तीन वाजता सुटका होताच श्रीनगरमध्ये फुटीरवादी मंडळींनी जल्लोष केला. थोड्या वेळाने रुबैय्या सईदची सुटका झाली आणि ते कळताच केंद्रीय गृहमंत्र्यांनी पंतप्रधान व सर्व मंत्र्यांना पेढे वाटले. पण दहशतवाद्यांच्या सुटकेने काश्मीर खोऱ्यातील वातावरण मात्र आणखी बिघडलं.