मुंबई : राज्यातील समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी असणाऱ्या लाईफ गार्डसना आवश्यक असलेली लाईफ जॅकेट, दोर, स्क्रीन व मेगाफोन यासारखी साधनसामुग्री व अद्यावत उपकरणे देण्यात येतील. या लाईफ गार्डंसना दिलेल्या उपकरणांची वेळोवेळी व विशेषत: पावसाळ्यात ऑडीट करण्यात येईल, असे उत्तर गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी आज विधानसभेतील लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सांगितले.
नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील वेणा प्रकल्प जलाशयात झालेल्या दुर्घटनेबाबत तसेच मुंबईतील जुहू चौपाटी व मरिन ड्राईव्ह येथील दुर्घटनेबाबत माहिती देताना डॉ. पाटील म्हणाले, मुंबईतील 29 ठिकाणे संवेदनशील म्हणून परिचीत आहेत. मुंबईतील वर्दळीच्या जुहू, गोराई, वरळी, दादर, गिरगाव चौपाटी,अक्सा, मढ या 6 समुद्र किनाऱ्यांवर 37 लाईफ गार्ड कार्यरत असून आपत्कालीन व्यवस्था म्हणून 118 कर्मचाऱ्यांची शिफ्टप्रमाणे नेमणूक करण्यात येते. या लाईफ गार्डसना मुंबई महानगरपालिकेतर्फे आवश्यक ती साधनसामुग्री देण्यात येईल व त्यांचे वेतन वाढविण्यासंबंधीही विचार करण्यात येईल.
नागपूर दुर्घटनेतील वेण्णा जलाशयातील दुर्घटनेबाबत चौकशी करण्यात येईल. तसेच वेण्णा जलाशयातील मासेमारीच्या बोटींचे नियंत्रण करण्याची जबाबदारी मत्स्योत्पादन विभागाची होती. अनधिकृतपणे या जलाशयात मासेमारी करणाऱ्या बोटींची चौकशी करण्यात येईल व चौकशी करुन दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.
डॉ. पाटील पुढे म्हणाले, पावसाळी पर्यटनाच्या ठिकाणी गृहविभाग, पर्यटन विभाग, नगरविकास विभाग यांच्या समन्वयाने सुरक्षेबाबत एकात्मिक आराखडा बनवून पर्यटकांच्या सुरक्षेची व्यवस्था करण्यात येईल. धोकादायक पावसाळी पर्यटन क्षेत्र निश्चित करुन त्या त्या ठिकाणी सुरक्षेचे फलक लावण्यात ये तील.
या लक्षवेधी चर्चेत सदस्य सर्वश्री जयंत पाटील, अस्लम शहा, वैभव नाईक, सुधाकर कोहळे यांनी या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत सहभाग घेतला.