अमरावती : नांदगाव पेठ येथील वस्त्रोद्योग पार्कमुळे अमरावती गारमेंट हब म्हणून विकसित होत आहे. औद्योगिक वसाहतीत जागेचा ताबा घेतल्यापासून पाच वर्षात प्रत्यक्ष उत्पादन सुरू केल्यास उद्योगांना विशेष प्रोत्साहनपर सवलती देण्यात येतील, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. येथील वस्त्रोद्योग पार्कमधील रेमंड उद्योग समुहातील लिनन यार्न व कापड निर्मिती उद्योगाच्या उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, उद्योग मंत्री सुभाष देसाई, वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील, आमदार सुनिल देशमुख, यशोमती ठाकूर, रवी राणा, अनिल बोंडे, माजी खासदार विजय दर्डा, रेमंडचे व्यवस्थापकीय संचालक गौतम हरी सिंघानिया आदी उपस्थित होते.
मेक इन इंडिया अंतर्गत वस्त्रोद्योग पार्कमधील पहिला करार रेमंड उद्योग समूहासोबत करण्यात आला. गेल्या वर्षात झालेल्या या करारानंतर विक्रमी एक वर्षाच्या कालावधीत हा प्रकल्प उभा राहून प्रत्यक्ष उत्पादनाला सुरूवात झाली आहे. त्यासोबतच कर्मचाऱ्यांसाठी शाळा आणि निवास प्रकल्प उभे राहत आहे. फार्म, फॅब्रीक, फॅशन आणि फॉरेन असा एकात्मिक विकास या वस्त्रोद्याग पार्कच्या माध्यमातून होत आहे. राज्य शासनाच्या प्रयत्नांमुळे याठिकाणी विविध 200 प्रकल्प सुरू होतील. यात 8 मोठे उद्योग आहेत. या उद्योगाच्या माध्यमातून सुमारे 30 हजार रोजगार उपलब्ध होतील. या उद्योगांमध्ये प्रामुख्याने स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा. रोजगारासाठी कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रशिक्षणाच्या सोयींसाठी प्रयत्न करावेत, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
अमरावती हे कोलकातानंतर देशातील महत्त्वाचे गारमेंट हब म्हणून उदयास येत आहे. औद्योगिक विकास महामंडळाने याठिकाणी उत्कृष्ट सुविधा दिल्या आहेत. कापूस उत्पादन, प्रक्रिया, कापड निर्मिती आणि निर्यात या एकाच ठिकाणी होणार असल्याने अतिरिक्त जागेची आवश्यकता लक्षात पडणार आहे. त्यासाठी लगतचीच तीन हजार हेक्टर जमीन अधिग्रहित करण्यात येईल. कापूस उत्पादन क्षेत्रात असे उद्योग उभे राहिल्यास येथील अर्थव्यवस्था अधिक बळकट होण्यास मदत मिळणार आहे. प्रक्रिया उद्योगामुळे कापसाची मुल्यवृद्धी होऊन स्थानिक शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ मिळेल.
केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले, रेमंड उद्योगाचे उद्घाटन ही विदर्भासाठी महत्त्वाची घटना आहे. कापसावरील प्रक्रिया उद्योग विदर्भात यावे, यासाठी राज्य शासनाने केलेले प्रयत्न प्रशंसनीय आहे. जलसंधारण, कृषि उत्पादकता वाढविण्यासोबतच उद्योगांसाठी पूरक वातावरण निर्माण केल्यामुळे विकास गतीने होत आहे. अमरावती येथील वस्त्रोद्योग पार्कचा होत असलेला विकास पाहून याठिकाणी ड्रायपोर्ट उभारण्यासाठी संपूर्ण सहकार्य दिल्या जाईल. अमरावती हा संत्रा उत्पादक भाग असल्यामुळे येथे संत्रा प्रक्रिया उद्योगासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. यासाठी पतंजली उद्योग समूहाकडून तीन हजार कोटींची गुंतवणूक होत आहे. यासाठी दररोज 800 टन संत्रा लागणार आहे. यासाठी काळाची पावले ओळखून शेतकऱ्यांनी उत्पादकता वाढविण्यावर भर द्यावा. उद्योगांचा फायदा भूमिपूत्रांना व्हावा, यासाठी शासनातर्फे प्रयत्न करण्यात येतील.
उद्योग मंत्री देसाई म्हणाले, कमी कालावधीत रेमंडने हा उद्योग उभारला आहे. कर्मचाऱ्यांचा गरजा ओळखून याठिकाणी शाळा आणि निवास व्यवस्था उभी राहत आहे. सर्वांगीण विकासाचा रेमंडचा प्रयत्न प्रशंसनीय आहे. याठिकाणी सोयी-सुविधा मिळत असल्यामुळे मोठे उद्योग सुरू होत आहे. यासाठी लागणारे कौशल्य निर्माण करण्यावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
सिंघानिया यांनी, अठरा महिन्यापूर्वी केलेल्या राज्य शासनासोबतच्या सामंजस्य कराराचे मुर्त स्वरूप याठिकाणी दिसून येत आहे. याठिकाणी असलेल्या सुविधांमुळे येत्या काळात या वस्त्रोद्योग पार्कला जागतिक दर्जाचे वस्त्रोद्योग केंद्र बनविणार असल्याचे सांगितले.
कार्पोरेट अध्यक्ष एस. के. गुप्ता यांनी प्रास्ताविक केले. प्रकल्प प्रमुख एच. व्ही. राव यांनी आभार मानले. कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्री यांनी सिंघानिया स्कूल आणि रेमंड कर्मचाऱ्यांसाठी निवास संकुलाचे भूमिपूजन केले. त्यानंतर लिनन निर्मितीची पाहणी केली.
माही टेरीकॉटचे भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते माहिती टेरीकॉट या उद्योगाचे भूमिपूजन करण्यात आले. हा उद्योग समूह जागतिक दर्जाची टॉवेल निर्मिती करणार आहे. पूर्णता सेंद्रीय पद्धतीने कापूस आणि रंगापासून टॉवेलची निर्मिती या केंद्रात होणार आहे. या ठिकाणी होणारे उत्पादन संपूर्णत: निर्यात होणार आहे. यावेळी उद्योजक सौरभ अग्रवाल उपस्थित होते.
यावेळी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले, या भागात उद्योग उभे करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. उद्योग उभे राहिल्याने या भागाचा वेगाने विकास करणे शक्य आहे. विकास प्रक्रियेत उद्योजक आणि स्थानिक नागरीकांनी सहभागी व्हावे. मोठ्या उद्योगांना पूरक ठरतील, असे उद्योग स्थानिक उद्योजकांनी उभारावे, शासन त्यांना पूर्ण मदत करेल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी रोहिराज ॲण्ड कंपनी, श्रृती टेक्सटाईल, लकी ब्रदर्स व ओम साईराम टेक्सटाईल या उद्योगांच्या कोनशिलेचे अनावरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले.