मुंबई : ‘ओरॅकल’ ने महाराष्ट्रात अधिकाधिक गुंतवणूक करुन आपले व्यावसायिक संबंध अधिक दृढ करावेत. कंपनीला शासनातर्फे आवश्यक सोयीसुविधा पुरवून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
सह्याद्री अतिथीगृहात ओरॅकलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सॅफ्रा कॅट्झ यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य सचिव सुमीत मल्लिक, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार गौतम, उद्योजक उदय कोटक, आनंद बजाज यांच्यासह विविध बँकांचे उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते.
ओरॅकल कंपनी ही तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात गेल्या ३० वर्षांपासूनअग्रस्थानी आहे, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या कंपनीने व्यवसायाच्या दृष्टिकोनातून नेहमीच भारत केंद्रीत विचार केला आहे. येत्या १ जुलैपासून जीएसटी लागू होत असताना ओरॅकलने आपल्या सुविधा व यंत्रणा आताच तयार करुन ठेवल्या आहेत. त्यामुळे व्यवसायांना आपले लेखे आणि डाटाचे व्यवस्थापन करण्यास मदत होणार आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात ओरॅकलशी भागीदारी वाढवण्यास महाराष्ट्र शासन इच्छुक आहे.
तंत्रज्ञान अद्ययावतीकरण, उद्योग निर्मिती, नवनिर्माण आदी बाबींमध्ये खासगी क्षेत्राशी भागीदारी करेल. आम्ही राज्यातील २९ हजार ग्रामपंचायतींमध्ये ‘आपले सरकार’ च्या माध्यमातून डिजीटल आणि आर्थिक साक्षरता निर्माण केली आहे. १५ हजार पीओएस मशीन पुरविल्या आहेत. शासन आता कोणतीही रक्कम रोखीच्या स्वरुपात स्वीकारणार नसून आपली खेडी कॅशलेस व्यवहाराकडे गतीने प्रवास करत आहेत. सर्व जमिनीविषयक अभिलेख आणि मालमत्तांची माहिती डिजीटल करण्याचे कामही शासन करीत आहे, असेही त्यांनी सांगितले.
सॅफ्रा कॅट्झ म्हणाल्या की, भारताबरोबरच महाराष्ट्र शासनाशी ओरॅकलचे दृढ संबंध असून ते वृद्धिंगत करण्यासाठी आपले नेहमीच प्रयत्न राहतील. ओरॅकलने भारतात आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्याचे ठरविले आहे. भारताच्या ‘मेक इन इंडिया’, ‘डिजीटल इंडिया’, ‘मेक फॉर इंडिया’ आदी महत्त्वपूर्ण योजनांमध्ये ओरॅकलचा महत्त्वाचा वाटा असेल. ‘जीएसटी’ साठी ओरॅकलची डिजीटल यंत्रणा तयार आहे. आम्ही मोठ्या उद्योगांबरोबरच लघु उद्योगांशीही संबंध जोडण्याला प्राधान्य देत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व द्रष्टे आहे, असे कौतुकाचे उद्गारही त्यांनी काढले.
यावेळी सॅफ्रा कॅट्झ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योजक आणि बँकांच्या अधिकाऱ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली.