रत्नागिरी :राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गंत जिल्ह्याच्या आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या सुमारे ४०० ते ४५० कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱयांनी मंगळवारपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. शिक्षणाच्या व अनुभवाच्या आधारे नियमित शासन सेवेमध्ये समायोजन करण्यात यावे अशी प्रमुख मागणी आहे. शासनाने आश्वासन देऊनही ते न पाळल्याने हे १४ मे पर्यंत कामबंद व त्यानंतर नाशिक ते मुंबई असा लॉगमार्च काढून २४ मे पासून मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत कामबंदचा इशारा देण्यात आला आहे. शासनाच्या आश्वासनावर विश्वास ठेवून यापूर्वी केलेल्या आंदोलनाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती. कंत्राटी कर्मचारी यांच्या नियमित शासन सेवेमध्ये समायोजनाकरीता कामबंदा आंदोलन केले होते. त्यावेळी आरोग्यमंत्री डॉ. दिपक सावंत यांनी महासंघासोबत केलेल्या चर्चेवेळी १० दिवसांत सभा घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यावेळी सभेमध्ये त्रिस्तरीय समिती स्थापनेबाबतचा शासन निर्णय काढण्यात येईल. त्यामध्ये संघटनेच्या अध्यक्ष व सचिव यांचा निमंत्रित सदस्य म्हणून सहभाग घेण्यात येईल. प्रथम सभा घेवून त्या सभेमध्ये एन.एच.एम. अंतर्गंत कार्यरत कंत्राटी अधिकारी, कर्मचारी यांचे समायोजनाच्या दृष्टीने पुढील पदभरती थांबविण्याचा निर्णय १० दिवसांत घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. समिती स्थापनेपासून ३ महिन्यांच्या कालावधीत एन.एच.एम.अंतर्गंत सर्व कर्मचारी यांचे आर.आर.मध्ये बदल करून समायोजन करण्यात येईल असे सांगण्यात आले होते. सभेमध्ये झालेल्या निर्णयानुसार व मंजूर केलेल्या सर्व मागण्यांबाबत त्वरीत परिपत्रक काढण्यात येतील असे आश्वासन संघटनेला दिले होते. मात्र आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार निर्णय न झाल्याने ८ मे पासून या राष्ट्रीय आरोग्य अभियानात कार्यरत असलेल्या कंत्राटी अधिकारी, कर्मचाऱयांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन १४ मे पर्यंत चालू राहणार आहे. त्यासाठी येथील जिल्हा परिषद कार्यालयासमोर सकाळी १० ते सायं. ५.३० यावेळेत या अधिकारी, कर्मचाऱयांचे ठिय्या आंदोलन सुरू राहणार आहे. या आंदोलनामुळे राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कामकाजाचा बट्ट्याबोळ उडण्याची चिन्हे उभी ठाकली आहेत. त्या कारभाराला जबाबदार शासन राहणार असल्याचे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी, कर्मचारी महासंघ, शाखा रत्नागिरी यांच्यावतीने सांगण्यात आले आहे.