
रत्नागिरी जिल्ह्यात रात्रभर पाऊस आणि सोसाट्याचा वारा
पहाटेपासून वाऱ्याचा जोर वाढला; जिल्ह्यातील वीज पुरवठा देखील खंडित
ठिकठिकाणी झाडं कोसळली
रत्नागिरी, 3 june : रत्नागिरीच्या किनारपट्टी भागात निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसला. जिल्ह्यात रात्रभर पावसाचा जोर आणि सोसाट्याचा वारा होता. पहाटेपासून हा जोर देखील वाढत असल्याचे चित्र होतं. वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी झाडं पडली, काहींच्या घरावर तर गाड्यांवर देखील झाडं पडली. तर विजेचे पोलही पडले. त्यामुळे ठिकठिकाणी नुकसानीच्या घटना घडल्या.
निसर्ग चक्रीवादळ दुपारी जिल्ह्याच्या किनारपट्टीपासून पुढे सरकलं आहे. मात्र जिल्ह्यात पावसाचा जोर आणि वाऱ्याचा वेग वाढला होता. त्यामुळे ठिकठिकाणी झाडं पडल्याच्या घटना घडल्या आहेत.
संगमेश्वर तालुक्यातील देवरुखमधील भंडारवाडीत झाड कोसळून घराचं नुकसान झाले आहे. त्यामुळे निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम किनारपट्टीपासून 50 किमी दुर असलेल्या देवरुखातही जाणवत आहे.
देवरुखमध्ये काल मध्यरात्रीपासून परिसरात रिमझिम पाऊस सुरु होता. तर सकाळी 6 वाजल्यापासून पावसाने जोर धरला असून आता पावसासोबत वाराही वेगाने वाहत आहे. शहरातील भंडारवाडी येथे वाऱ्याने एक वृक्ष मुळासकट उन्मळून पडला यामुळे घरांचे आणि शौचालयाचे नुकसान झाले आहे.
रत्नागिरीतही ठिकठिकाणी झाडं कोसळली
चक्रीवादळामुळे रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव मार्गावरील बानखिंड येथे झाड कोसळल्याने शिरगाव च्या दिशेने जाणारा रस्ता बंद झाला आहे, फक्त दुचाकी वाहने जाण्यासाठी जागा आहे. तर थिबा पॅलेस येथेही झाड कोसळले आहे.
तर गणेशगुळे कुर्धे येथील शिंदे वाडीतील ग्रामस्थ विकास शिंदे यांच्या घरावर झाड पडून घराचे मोठे नुकसान झाले असून, दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे. बाजूला उभ्या असलेल्या सुरेश शिंदे यांच्या रिक्षावरही झाड कोसळल्याने रिक्षाचे नुकसान झाले आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात ठिकठिकाणी झाडं पडल्याच्या घटना घडल्या.
भरकटलेले जहाज बंधाऱ्यावर येऊन धडकले;
निसर्ग चक्रीवादळाचा काहीसा परिणाम रत्नागिरी किनारपट्टीवर झाला. दरम्यान वादळी वारा आणि लाटांच्या तडाख्यात एक जहाज सापडलं होतं. आज सकाळी हे मालवाहू जहाज भगवती समुद्र किनाऱ्यापासून लाटांच्या तडाख्यामुळे भरकटलं होतं. त्यानंतर हे जहाज मिऱ्या येथील पांढरा समुद्राजवळच्या धुप प्रतिबंधक बंधाऱ्यावर येऊन धडकले आहे. या जहाजावर 13 खलाशी असून त्यांच्या बचावासाठी बचावकार्य हाती घेण्यात आले आहे.
वादळा सोबत समुद्राला आलेल्या भारतीने किनारपट्टी भागात लाटांचे तांडव सुरू आहे. या तडाख्यात एक जहाज सापडले. हे बार्ज भगवती बंदर येथे नांगरून ठेवण्यात आले होते. मात्र लाटांच्या तडाख्याने नांगर तुटल्याने बार्ज भरकटले. भगवती बंदर येथून भरकटलेले जहाज लाटांच्या तडाख्याने पांढरा समुद्र किनाऱ्यानजिक पोचले. समुद्राच्या भरतीसोबत हे बार्ज जाऊन किनाऱ्यावर उभारलेल्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्यावर जाऊन आढळले. सुदैवाने यात बार्ज चे नुकसान झाले नसून बार्ज सह खलाशांच्या बचावासाठी काम सुरू आहे.