नागपूर : राज्यातील महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्यातील सर्वच जिल्ह्यात निर्भया पथकाची स्थापना करण्यात येणार असल्याचे गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत सांगितले.
विधानपरिषदेत नियम 97 अन्वये सदस्य डॉ. निलम गोऱ्हे यांनी उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना केसरकर बोलत होते. राज्यातील महिला आणि बालकांची सुरक्षितता महत्वाची आहे. यासाठी सर्वच 36 जिल्ह्यात निर्भया पथकाची स्थापना करण्यात येणार आहे. केवळ बालक आणि महिलांच्या गुन्ह्यांचा तपास हे पथक करेल. यासाठी पोलिस अधिकारी व कर्मचा-यांची विशेष नियुक्ती करण्यात येईल. हे पथक आपला अहवाल थेट पोलिस महासंचालकांना सादर करेल. तसेच निर्भया पथकाची सर्वसामान्यांना माहिती व्हावी यासाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वयंसेवी संस्थांना सोबत घेऊन जागृती करण्यात येईल. राज्यातील जनतेच्या सुरक्षितेतला शासन सर्वोच्च प्राधान्य देत असल्याचे केसरकर यांनी सांगितले.
या चर्चेत सदर स्मिता वाघ, हुस्नबानो खलिफे यांनी भाग घेतला.