लोकांना पॅनिक करण्यापेक्षा ‘आरटी-पीसीआर’वर भर द्यावा; आरोग्य यंत्रणेवर ताण, सर्वसामान्यांमध्ये भीती
रत्नागिरी, प्रतिनिधी : ज्या अँन्टीजेन टेस्ट मधून सर्वाधिक चुकीचा रिझल्ट येण्याची शक्यता आहे त्या टेस्ट सरसकट जिल्ह्यात करण्यापेक्षा खात्रीशीर असलेल्या ‘आरटी-पीसीआर’ टेस्टच केल्या जाव्यात. सरस्कट सर्वांच्याच रॅपिड अँन्टीजेन टेस्ट केल्या गेल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येत असून सर्वसामान्यांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शांत डोक्याने विचार करून आरटी-पीसीआर वर भर द्यावा. जेणेकरून आरोग्य यंत्रणेवरील ताण आणि जनतेतील भीती कमी होईल, अशी सूचना जिल्हाप्रशासनाला माजी खासदार निलेश राणे यांनी काल शनिवारी पत्रकारांशी बोलताना केली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 15 दिवसात अचानक रुग्णसंख्येत वाढ झाली असून सर्वाधिक रुग्णसंख्या रॅपिड अँटीजेन टेस्ट मधील असल्याचे दिसून आले आहे. मुळात कोरोनासाठी तीन प्रकारच्या चाचण्या केल्या जातात. एक आरटी-पीसीआर, दुसरी अँटीजेन आणि तिसरी अँटीबॉडी टेस्ट. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) नेही सुरुवातीपासून कोव्हिडच्या चाचण्यांसंबंधी नियम बनवून दिलेत. आरटी-पीसीआर टेस्ट म्हणजे Real Time Reverse Transcription Polymerase Chain Reaction.
यालाच स्वॉब टेस्ट असंही म्हटलं जातंय. आरटी-पीसीआर टेस्ट ही कोरोनाचा संसर्ग झालाय की नाही हे खात्रीशीर पद्धतीने सांगू शकते. ICMR ने या चाचणीला टेस्टिंगचा गोल्ड स्टँडर्ड असं म्हटलंय. तुमच्या शरीरात कोरोनाचा संसर्ग कमी प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात असला तरी तो या टेस्टमार्फत कळू शकतो. रत्नागिरी जिल्ह्यात आरटी-पीसीआरसाठीची करोडो रुपये खर्चून उभारलेली यंत्रणा असताना ती यंत्रणा पूर्ण क्षमतेने वापरावी, असं निलेश राणे यांनी सांगितले.
याउलट रॅपिड अँटीजेन या टेस्टचे आहे. या टेस्ट्समधून फॉल्स निगेटिव्ह म्हणजे चुकीचा नकारात्मक रिझल्ट येण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे अँटीजेन मध्ये निगेटिव्ह आलेल्या व्यक्तीची आरटी-पीसीआर चाचणी सुद्धा करवून घ्यावी असं खुद्द ICMR ने सांगितलंय. असं असताना परिस्थितीत रत्नागिरी जिल्ह्यात नाहक सरसकट अँटीजेन टेस्ट होत आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात आरोग्य विभागाकडून शुक्रवारी सायंकाळी आलेल्या अहवालात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 513 एवढी होती. त्यात 344 एवढे रुग्ण अँटीजेन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आले. याशिवाय निगेटिव्ह रुग्णांची संख्या खूप आहे. या अँटीजेन चाचणीमुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण झाला असून जिल्हा प्रशासनाने योग्य नियोजन करून आरटी-पीसीआर चाचणी वाढवली पाहिजे. त्यामुळे ताण देखील कमी होईल आणि जिल्ह्यातील सर्वसामान्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे तीही दूर होईल, असे निलेश राणे यांनी सांगितले आहे.