
महिनाभरापूर्वी निकृष्ट पोषण आहाराचा मुद्दा समोर आला होता. रत्नागिरी जिह्यात वाटप करण्यात येणारा पोषण आहार ज्या चिपळुण तालुक्यातील खडपोली येथील गोडाऊनमध्ये साठवून ठेवला जातो , पॅकिंग केला जातो , वितरित केला जातो त्याच गोडाऊनमधून दुर्गंधी येत असल्याने तेथील स्थानिकांनी आवाज उठवला व यामुळे साठवून ठेवण्यात आलेला पोषण आहारसाठा हा निकृष्ट , सडलेला, दुर्गंधीयुक्त, आरोग्यास हानीकारक असल्याचे स्पष्ट झालं होतं.
त्यामुळे गोदामात धान्य पुरवठा करणारे ठेकेदार यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर हे धान्य रातोरात गायब करण्याचाही प्रयत्न झाला. स्थानिक प्रतिनिधी व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी हा डाव उधळून लावला. आमदार शेखर निकम, जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने आदींनी घटनास्थळी भेट देऊन कारवाईच्या सूचनाही दिल्या. मात्र अद्यापही यातील दोषींवर कारवाई झालेली नाही, त्यामुळे अडरेकर यांनी स्वातंत्र्यदिनी उपोषणाचा पवित्रा घेतला आहे