मुंबई, (अक्षय गायकवाड): सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेसची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली. यामुळे संतप्त झालेले ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी नवरात्रौत्सवात ‘घट’स्थापना करणार असल्याचे संकेत दिले. आपल्याला विश्वासात न घेता सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी नेमण्यात आल्याने राणेनी संताप व्यक्त केला. तसेच महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली.
काँग्रेसमध्ये गेल्यापासून जिल्ह्यातील कोणताही निर्णय घेताना मला विचारात घेतले जात असे. मात्र यावेळी कोणतीही विचारपूस न करता जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. तसेच नवीन जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवनियुक्त जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांच्या नियुक्तीवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एक वृत्तवाहिनीशी ते बोलत होते. राणेंनी काँग्रेसच्या राज्यातील नेतृत्वावर जोरदार टीका करत नवनियुक्त जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सिंधुदुर्गातील या घटनाक्रमामागे मोहन प्रकाश आणि अशोक चव्हाण यांचा हात आहे. या दोघांच्या षडयंत्रामुळे काँग्रेस संपवण्याचे काम सध्या सुरू आहे.
जिल्हा परिषद, जिल्हा बँक काँग्रेसच्या ताब्यात असलेला सिंधुदुर्ग हा राज्यातील एकमेव जिल्हा आहे. त्याबरोबर जिल्हा नियोजन समितीत काँग्रेसचे वर्चस्व आहे, जिल्ह्यातील बहुतांश पंचायत समित्या, नगरपंचायती आणि ग्रामपंचायतीमध्ये कांग्रेसचे वर्चस्व आहे. ज्या कार्यकर्त्यांमुळे ही सत्ता आली त्या कार्यकर्त्यांनाच घरी बसवण्याचे काम आज काँग्रेसने केले आहे, असा आरोप राणे यांनी केला. तसेच जे लोक काँग्रेसला संपवत आहेत किंवा संपवण्याची सुपारी घेतली आहे त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेसमध्ये ज्या अपेक्षेने गेलो होतो त्याबाबतीत माझी निराशा झाली. आता या सर्वप्रकरणाचा सोक्षमोक्ष मी लवकरच लावेन, अगदी नवरात्रौत्सवातच मोठी घोषणा करेन, असे सुतोवाही राणेंनी केले.