
मुंबई, 12 सप्टेंबर 2025 : संजय राऊत नाशिकमध्ये ड्रग्जविरोधी मोर्चा काढणार असल्याची घोषणा करत आहेत. त्यावर नवनाथ बनांनी उपरोधिक प्रश्न उपस्थित केला –
“जर राऊत ड्रग्जविरोधी मोर्चा काढत असतील, तर त्यांनी प्रथम डिनो मोरियाला सोबत घ्यावं. तसेच मनसे नेत्यांनी त्यांची ब्लड टेस्ट करून घ्यावी. कारण राऊत गांजा ओढून मोर्चा काढणार नाहीत याची खात्री जनतेला हवी आहे.”
ते पुढे म्हणाले, “ड्रग्जविरोधात बोलण्याचा राऊतांना कोणताही नैतिक अधिकार नाही. त्यांचा मोर्चा काढायचा असेल, तर त्याची सुरुवात बंद्र्यातून करावी, डिनो मोरियाला घेऊन करावी, आणि नंतरच ते नाशिककरांना उपदेश द्यावा.”
अराजकतेचे आरोप – राऊतांच्या डोक्यातील कल्पना
संजय राऊत यांनी नाशिक, पुणे, महाराष्ट्रात अराजकता असल्याचा आरोप केला. त्यावर नवनाथ बनांनी पलटवार करत म्हटलं –
“महाराष्ट्रात अराजकता नाही, देशात अराजकता नाही; जर अराजकता कुठे असेल तर ती फक्त राऊतांच्या डोक्यात आहे. उबाठा गट आणि राऊत यांच्या विचारांची भेसळ झाली आहे. प्रखर हिंदुत्वाची भाषा करणारे राऊत आज नेपाळसारखी परिस्थिती महाराष्ट्रात आणण्याचा विचार करत आहेत. पण कावळ्याच्या श्रापाने गाय मरत नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावे.”
नवनाथ बन म्हणाले की, प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं नाशिक शहर आज बदनाम करण्याचं काम उबाठा गट आणि मनसे यांच्या माध्यमातून संजय राऊत करत आहेत.
गेल्या १५ वर्षांपासून उबाठा गटाचे नाशिक संपर्क प्रमुख म्हणून राऊतांनी गुंडांना हाताशी धरून शहराची प्रतिमा मलिन केली. “नाशिक ही पवित्र भूमी आहे, आणि त्याच भूमीत राऊत राक्षसाची भूमिका बजावत आहेत,” असा थेट आरोप बन यांनी केला.
जनतेचा विश्वास भाजपवर, राऊतांवर नाही
नवनाथ बन म्हणाले की, “जनता उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व नाकारून आदरणीय देवाभाऊंवर विश्वास ठेवते. 132 आमदार निवडून आणणारी जनता आमच्यासोबत आहे. उबाठा गटाला कोणी मत देत नाही.”
राऊत कधीही थेट जनतेतून निवडून आले नाहीत, तर राज्यसभेत फक्त अर्ध्या मतांनी पोचले, हे त्यांनी अधोरेखित केलं.
ते पुढे म्हणाले – “मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत कोणताही वॉर्ड निवडा. भाजपचा साधा कार्यकर्ता देखील राऊतांना हरवेल. एवढंच खुमखुमी असेल तर सर्व सामान्य भाजप कार्यकर्ता किंवा मी स्वतः राऊतांविरुद्ध निवडणूक लढायला तयार आहे. मग दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल.”
मराठा समाजाच्या फसवणुकीचा हिशेब
“मराठा समाजाची खरी फसवणूक उबाठा गट आणि संजय राऊत यांनी केली आहे,” असा घणाघात नवनाथ बनांनी केला.
ते म्हणाले –
• 2014–2019 मध्ये फडणवीस सरकारने 14% आरक्षण दिलं. पण ते रद्द करण्याचं पाप राऊत आणि उबाठा गटाने केलं.
• मराठा मुक मोर्च्याला ‘मुका मोर्चा’ म्हणण्याचा अपमान राऊतांनी केला.
• आंदोलकांना ‘ढेकून’ म्हणण्याचं पापही राऊतांचंच आहे.
“म्हणूनच मराठा समाजाबद्दल बोलण्याचा राऊतांना अधिकार नाही. मराठे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालतात, पण ते विचार राऊतांना पचत नाहीत,” असा घणाघात त्यांनी केला.
छत्रपतींच्या अपमानावर मौन – काँग्रेससाठी मूक समर्थन
नवनाथ बन म्हणाले –
“कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचं स्टेशन बदललं. या अपमानावर राऊत गप्प राहिले. त्यांनी काँग्रेसचा निषेध केला नाही. उलट त्यांनी जबाबदारी ढकलून ‘शरद पवार आणि फडणवीस यांनी बोलावं’ असं म्हटलं. देवाभाऊंनी लगेच निषेध केला, पण राऊत मात्र मूक आहेत.”
ते पुढे म्हणाले – “जनाब उद्धव ठाकरे, जनाब राऊत, छोटे मियाँ आदित्य ठाकरे यांनी काँग्रेसची साथ सोडली नाही, तर जनता शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही. येणाऱ्या निवडणुकांत उबाठा गटाचा धुव्वा उडवला जाईल.”
औरंगजेब उदो उदो
“आज महाराष्ट्रात औरंगजेबाची पिलवळ वाढली आहे. आणि उबाठा गट म्हणजे औरंगजेब फॅन क्लबचे प्रवक्ते झाले आहेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान त्यांना दिसत नाही. पण हिंदवी स्वराज्याच्या भूमीत औरंगजेबाचा उदो-उदो करणाऱ्याला जनता जशास तसं उत्तर देईल,” असा इशारा नवनाथ बनांनी दिला.
त्यांनी सरकारला मागणी केली की, औरंगजेबाचा जयघोष करणाऱ्यांवर तातडीने कारवाई केली जाईल















