मुंबई : महाराष्ट्र सरकारतर्फे मुंबईतल्या एमएमआरडीए मैदानावर ४ दिवसीय आंतरराष्ट्रीय रामायण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. २५ ते २८ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या या महोत्सवाची परिपूर्ण तयारी करण्याचे निर्देश पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी संबंधितांना दिले. नियोजनाबाबत पर्यटनमंत्री श्री. रावल यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी पर्यटन विभागाच्या सचिव विनिता सिंगल, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.भारतासह कंबोडिया, फिलिपाईन्स, इंडोनेशियाचे कलाकार या महोत्सवात संस्कृत आणि हिंदी भाषेत रामायण सादरीकरण करणार आहेत. हा महोत्सव मुंबईच्या माध्यमातून जगासमोर सादर केला जावा. त्यासाठी परिपूर्ण तयारी करण्याचे निर्देश पर्यटनमंत्री श्री. रावल यांनी यावेळी दिले.भारतासह ४ देशातील कलाकारांकडून सादर केल्या जाणाऱ्या रामायण महोत्सवाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आदी उपस्थित राहणार आहेत. याशिवाय सिनेमा, उद्योग, क्रीडा, धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांना विशेष निमंत्रित करण्यात येणार आहे.५० बाय ७० च्या व्यासपीठावर सादर होणाऱ्या या महोत्सवात शेकडो देशी-विदेशी कलाकार रामायण सादर करतील. यासाठीच्या तिकिटांची ऑनलाईन बुकिंगही करता येणार आहे. दररोज २ तासाचा प्रयोग होईल. एक देश एक दिवस सादरीकरण करणार आहे. टाइम्स फाउंडेशन या कार्यक्रमाचे असोसिएट पार्टनर आहेत.
या कार्यक्रमाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३३ व्या सुरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तमेळा २०१९ च्या उद्घाटन सोहळ्यात केली आहे.