मुंबई दि. 5 : परिसंस्थेच्या पुनर्संचनासाठी झाडे लावणे व त्यांची जोपासना करणे अत्यंत आवश्यक असल्याचा संदेश मुंबई जिल्हा विधी सेवा समिती अध्यक्ष तथा मुंबई शहर दिवाणी व सत्र न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश न्या. श्रीनिवास अग्रवाल यांनी दिला आहे.
शहर दिवाणी व सत्र न्यायालय, मुंबई येथे जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी न्या. अग्रवाल तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध प्रकारच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले.
या कार्यक्रमास सर्वश्री न्या. दिनेश कोठलीकर, न्या. प्रशांत राजवैद्य, न्या. गिरीष अग्रवाल तसेच न्यायालयीन कर्मचारी व न्यायालयीन कर्तव्यावरील पोलीस अधिकारी उपस्थित होते.
चला हिरवळ पसरवूया
जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत ‘चला हिरवळ पसरवूया’ हे अभियान राबविण्यात आले. त्यात कोठेही एक झाड लावा व वृक्ष लागवडीचा फोटो जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या ईमेलवर पाठवा, असे आवाहन जनता तसेच सरकारी कार्यालये यांना करण्यात आले होते. या अभियानासही भरघोस प्रतिसाद प्राप्त झाल्याचे विधी सेवा प्राधिकरण सचिव न्या. हितेंद्र वाणी यांनी सांगितले.