मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईसह राज्यात सोमवारी संध्याकाळी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. तासाभरात किमान ११ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर शहरासह उपनगरात ८ ठिकाणी झाडे पडली. दरम्यान, पावसाच्या आगमनामुळे मुंबईकर सुखावला असला तरी मुंबईच्या विविध भागातील बत्तीगुल झाली होती. रस्ते वाहतूक व रेल्वे सेवेवर ही पावसाचा परिणाम झाला.
शनिवारी झालेल्या मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावताच तीन जणांचा जीव गेला. तर रविवारच्या विश्रांतीनंतर सोमवारी पुन्हा एकदा पाऊस बरसला आणि मुंबईकर काही काळ थांबला. महालक्ष्मी, एलफिन्स्टन, करीरोड, परळ, प्रभादेवी, प्रतीक्षा नगरसह अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला होता. मध्य व हार्बर रेल्वे सेवेवरही परिणाम झाल्याने घराकडे निघालेल्या चाकरमान्यांची त्रेधातिरपीट उडाली. भांडूप १० मिमी, मुलुंड ११ मिमी , गवाणपाडा ०९ मिमी, दहिसर ०९, मरोळ ०५ व प्रबोधनकार ठाकरे बोरीवली येथे ०६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर शहरात २, पूर्व उपनगरात ४ आणि पश्चिम उपनगरात २ ठिकाणी झाडे पडली. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही, अशी माहिती पालिका जनसंपर्क विभागाने दिली.