मुंबई : मुंबईच्या भरभराटीत सर्व जाती-धर्माच्या नागरिकांचा वाटा आहे. मुंबईचा गौरव वाढविण्यात मुंबई पोलिसांनी अभिमानास्पद कामगिरी केल्याचे कौतुकोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. मुंबई पोलीस दलाच्या वतीने आयोजित ईद मिलन कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या कार्यक्रमात ते शुभेच्छा संदेश देताना बोलत होते.कार्यक्रमास खासदार अॅड. माजिद मेमन, आमदार सर्वश्री राज पुरोहित, मोहम्मद आरिफ तथा नसीम खान, वारीस पठाण, अमीन पटेल, अस्लम शेख, मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर, सहआयुक्त देवेन भारती यांच्यासह मुस्लिम बांधवांच्या विविध संस्था, संघटनांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, रमजानचा पवित्र महिना स्वयंशिस्त शिकवितो. त्यामुळे धर्माचरणात त्याला मोठे महत्त्व आहे. मुंबईत सर्वच धर्मांचे सण-उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. यामध्ये मुंबई पोलिसांच्या सज्जतेला आणि दक्षतेचे मोठे योगदान आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे जगाचे लक्ष मुंबईकडे असते. अशा मुंबईच्या भरभराटीत सर्व जाती-धर्माच्या नागरिकांचा वाटा आहे. समाजहिताच्या गोष्टींसाठी राजकारणासह सर्व भेद बाजूला सारून एकत्र येण्याची परंपरा आहे. मुंबईचा गौरव वाढविण्यात पोलिसांनीही नेहमीच अभिमानास्पद कामगिरी केली आहे, असेही त्यांनी सांगितले.अल्पसंख्याकांच्या विकासासाठी शासनाने गत तीन वर्षांत आर्थिक तरतूद अडीच पटीने वाढविली. त्यामध्ये आजवर साडेचारशे कोटी रुपयांचा निधी खर्च केला. समाजातील तरुणांना विविध शिक्षणक्रमांसाठी शिष्यवृत्ती देण्याची नवी योजना कार्यान्वित केल्याचा उल्लेखही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केला. याप्रसंगी पोलीस आयुक्त श्री. पडसलगीकर यांच्यासह मान्यवरांची भाषणे झाली. उपायुक्त संजय ऐनापुरे यांनी आभार मानले.