मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दिनांक ०६ डिसेंबर २०१७ रोजी असलेल्या ६१ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत दाखल झालेल्या आंबेडकर अनुयायांची ओखी चक्रीवादळामुळे कोसळणाऱ्या पावसाने बृहन्मुंबई महापालिकेच्या विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. आतापर्यंत पालिकेच्या ७० शाळांमध्ये तात्पुरत्या निवासाची सर्व सुखसोयींसह व्यवस्था केली आहे. ज्या शाळांमध्ये अनुयायींकरिता तात्पुरत्या निवाऱयाची सोय करण्यात आली आहे, तेथे वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहेत. तसेच दादर रेल्वे स्टेशनवर उतरणाऱ्या अनुयायींना शिवाजी पार्क मंडपात न घेऊन जाता त्यांना विनाशुल्क बेस्ट बसेसव्दारे आसपासच्या परिसरात उपलब्ध असणाऱ्या शाळांमध्ये नेण्यात येत आहे.
ओखी चक्रीवादळ व दिनांक 4 डिसेंबर ते 07डिसेंबर 2017 या कालावधीत समुद्रास असलेल्या 4.5 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या भरतीच्या लाटांच्या पार्श्वभूमीवर पालिकेमार्फत विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. समुद्रकिना-यापासून जवळ असणा-या वस्त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, महापालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिका-यांची पथके तयार करुन गस्त घालण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. अग्निशमन दल, पोलीस, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक, नौदल यांची पथके चैत्यभूमी परिसरात तैनात ठेवण्यात आली आहेत, तर भारतीय तटरक्षक दलास सतर्क ठेवण्यात आले आहेत. पालिकेचे 24 विभागीय नियंत्रण कक्ष सतर्क ठेवण्यात आले असून आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध असून अशासकिय संस्थांची मदत देखील घेण्यात आली आहे. तसेच सोमवारपासून पडत असलेल्या पावसामुळे शिवाजी पार्क परिसरात चिखलाचे वातावरण तयार झाले आहे. महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी परिसरात येणा-या आंबेडकरी अनुयायांकरिता राहण्याची व्यवस्था करण्याकरिता ७० शाळा उघडून ठेवण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रकारे चैत्यभूमीपरिसरात असणारे हॉल्स व सभागृहे देखील उघडी ठेवण्यात आली आहेत. दादर रेल्वे स्थानक ते चैत्यभूमीकडे जाण्याकरिता बीईएसटीमार्फत मोफत बस सेवा उपलब्ध करुन देण्यात आली असून त्याचे पैसे महापालिकेमार्फत बीईएसटीला अदा करण्यात येणार आहेत. चैत्यभूमी परिसरात येणा-या अनुयायांकरिता जेवणाची व पाण्याची व्यवस्था तात्पुरत्या निवा-यांच्या ठिकाणी संबंधित सहाय्यक आयुक्त व अशासकिय संस्थांमार्फत करण्यात आलेली आहे. चैत्यभूमी परिसरात कोणत्याही प्रकारची असुविधा होऊ नये याकरिता उपायुक्त (परिमंडळ – 2) व त्यांच्या सहाय्याकरिता 3 सहाय्यक आयुक्तांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. चैत्यभूमी परिसरात 9 तात्पुरते आरोग्य कक्ष उभारण्यात अाले आहे. अधिक मदतीकरिता पालिकेच्या व 108 आणीबाणी वैद्यकिय सेवेच्या रुग्णवाहिका तत्पर ठेवण्यात आल्या आहेत. तात्पुरत्या निवा-यांच्या ठिकाणी आरोग्य सेवेसाठी वैद्यकिय पथके नेमण्यात आली आहेत. दरम्यान, ओखी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोणतेही रस्ते, पूल, सि लिंक बंद ठेवण्यात आलेले नाहीत. मुंबई शहर व उपनगरातील रेल्वे सेवा, वाहतूक सेवा सुरळीत सुरु आहे. नागरिकांनी / पर्यटकांनी कृपया समुद्रकिनारी आत जाणे टाळावे तसेच अफवा पसरवू नयेत व अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पालिकेने केले आहे.















