समर्पित भावनेने काम करणाऱ्या मनपा कामगार व कर्मचाऱ्यांना पुरस्कार केला अर्पण; स्पीक इंडिया या आशियातील प्रथितयश संस्थेद्वारे करण्यात आला गौरव
Mumbai : महानगरपालिका आयुक्त श्री. इकबाल सिंह चहल यांच्या नेतृत्वात बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कामगार – कर्मचारी – अधिकारी हे ‘कोविड‘ – ‘कोरोना‘ या साथ रोगाच्या काळात संघ भावनेने अक्षरश: दिवस-रात्र काम करुन मुंबईकरांची सेवा करीत आहेत. याच अनुषंगाने ‘एक्सलन्स इन क्रायसिस मॅनेजमेंट‘ या पुरस्काराने महानगरपालिका आयुक्त श्री. इकबाल सिंह चहल यांचा विशेष गौरव ‘स्पीक इंडिया‘ या प्रथितयश संस्थेद्वारे नुकताच करण्यात आला आहे. या निमित्ताने मनोगत व्यक्त करताना महानगरपालिका आयुक्तांनी सदर पुरस्कार आणि गौरव हा खऱ्या अर्थाने महानगरपालिकेच्या सर्व कामगार – कर्मचारी व अधिकाऱ्यांचा असल्याचे नमूद करत पुरस्कार त्यांना व बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संघ भावनेला समर्पित केला आहे.
भारतातील प्रशासकीय सेवेत वर्षभरात उल्लेखनीय योगदान देणा-या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिका-यांना ‘स्पीक इंडिया’ या संस्थेद्वारे दरवर्षी गौरविले जाते. यंदाच्या पुरस्कारांमध्ये विशेष उल्लेखनीय कार्य करणा-या भारतीय प्रशासकीय सेवेतील १० अधिका-यांचा गौरव करण्यात आला आहे. या अंतर्गत ‘एक्सलन्स इन क्रायसिस मॅनेजमेंट’ या पुरस्काराने बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त श्री. इकबाल सिंह चहल यांचा गौरव करण्यात आला आहे. यंदाच्या पुरस्कार निवड समितीमध्ये विविध क्षेत्रातील ७ मान्यवरांचा समावेश होता. या निवड समितीने महापालिका आयुक्त श्री. इकबाल सिंह चहल यांची निवड केली आहे.