रत्नागिरी, प्रतिनिधी : मुंबई – गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम सध्या सुरू आहे, मात्र ढिसाळ कामाचा फटका वाहनचालकांना बसत आहे.
चिखलाचे साम्राज्य
मुंबई – गोवा महामार्गावर लवेल – दाभिळ फाटा या ठिकाणी कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. या ठिकाणी महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे.
मात्र हे काम अजून पुर्ण झालेले नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर चिखल आणि मोठं मोठे खड्डे त्याठिकाणी निर्माण झाले आहेत. वाहन चालकांना या अर्ध्या किलोमीटर परिसरातून वाहन चालवणे मुश्किल झाले आहे. दरम्यान भर पावसातच या ठिकाणी खड्डे भरण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहनचालकांना त्याचा फटका बसत आहे.
भरणे नाका परिसरातही अर्धवट कामामुळे नागरिकांना त्रास
महामार्गाच्या अर्धवट कामामुळे यंदा भरणे नाका परिसरात लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुंबई – गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामामध्ये अत्यन्त ढिसाळपणा झाल्याने यंदा भरणे नाक्याची पावसामध्ये अक्षरशः दैना उडाली आहे. अर्धवट अवस्थेत गटारांची कामे ठेवल्याने भरणे नाका परिसरात अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.