रत्नागिरी (आरकेजी)- गणेशोत्सवापूर्वी मुंबई – गोवा महामार्गावरचे खड्डे बुजविण्यात येतील, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी दिली. मात्र, गणेशोत्सव तोंडावर आला तरी रस्त्यांवरील खड्डे कायम आहेत. ठेकेदार बांधकाम मंत्र्याना जुमानत नसल्याने रस्त्यांची दुरावस्था झाल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. त्यामुळे खड्ड्यांवरुन सेना- भाजपमध्ये सामना रंगणार आहे.
मुंबई गोवा महामार्गाची ३१ ऑगस्ट रोजी पाहणी करून गणेशोत्सवापूर्वी महामार्गाचे खड्डे भरा असे आदेश दिले होते. ९ ऑगस्टला सर्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील रविवारी ९ सप्टेंबर रोजी महामार्गाचा पाहणीदौरा करणार आहेत. मात्र, त्यापूर्वीच शिवसेनेने भाजपला रस्त्यांवरील खड्ड्यांवरुन लक्ष्य केले आहे. बांधकाम मंत्र्यांनी खड्डे भरण्याची मुदत दिल्यानंतरही रस्त्यांवर खड्डे कायम आहेत. महामार्गाचे काम केंद्राच्या माध्यमातून होत असल्याने ठेकेदारही केंद्रानेच नियुक्त केले आहेत. त्यामुळे ठेकेदार बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना जुमानत नसल्याने रस्त्यांची अशी अवस्था झाल्याचा आरोप रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी केला आहे. बांधकाम मंत्र्यांच्या आदेशानंतरही महामार्गाचे खड्डे बुजवण्याचे काम अद्यापही पूर्ण झालेलं नाहीय आणि जे ६० ते ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. याबाबत आपण समाधानी नसल्याचे वायकर म्हणाले. खासदार विनायक राऊत यांनीही रस्त्यांचे खापर भाजपवर फोडले. महामार्गावर काम करणारी एमईपी कंपनी निकृष्ठ दर्जाचे काम करत असून संबंधित ठेकेदारावर कारवाई होत नाही, असे राऊत म्हणाले.