
रजतपदक स्विकारल्यानंतर मुंबई अग्निशमन दलाचे जवान महापौरांसमेवत
मुंबई : मुंबईत विविध ठिकाणी लागलेल्या आगीच्या घटनांमध्ये मुंबई अग्निशमन दलाचे जवान आपला जीव धोक्यात घालून मुंबईकर नागरिकांचे जीव व वित्ताचे रक्षण करित असून त्यांच्या सामुहिक नेतृत्वामुळेच आगीवर नियंत्रण मिळविणे शक्य होत असल्याने या दलाच्या शौर्याचा मला अभिमान असल्याचे प्रतिपादन मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केले. ६२ अग्निशमन अधिकारी व कर्मचारी यांच्या असामान्य शौर्याबद्दलचे आयुक्तांचे रजतपदक प्रदान सोहळा मुंबईचे महापौरांच्या हस्ते आज महापालिका मुख्यालयातील सभागृहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी महापालिका आयुक्त अजोय मेहता, स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगांवकर, सुधार समितीचे अध्यक्ष अनंत नर, बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल कोकीळ, स्थापत्य समिती (उपनगरे) अध्यक्ष तुळशीराम शिंदे, माजी महापौर तथा नगरसेविका स्नेहल आंबेकर, स्थानिक नगरसेविका सुजाता सानप, नगरसेवक मंगेश सातमकर, नगरसेविका सुजाता पाटेकर, अतिरिक्त महापालिका आयुक्त आय.ए. कुंदन, उप आयुक्त (मध्यवर्ती खरेदी खाते) रामभाऊ धस, प्रमुख अग्निशमन अधिकारी प्रभात रहांगदळे हे मान्यवर उपस्थित होते.
प्रत्येक माणसाच्या अंगी हिम्मत असणे आवश्यक असून ती अग्निशमन दलातील अधिकारी व कर्मचारी यांच्यामध्ये ठासून भरली असल्याने या हिम्मतीच्या जोरावरच आपण अनेक कठीण प्रसंगी त्यावर मात करुन यशस्वीरित्या बाहेर पडले असल्याचे त्यांनी सांगितले. जगामध्ये आपल्याबद्दल एक आदर असून प्रसंगी कुटुंबाकडे दुर्लक्ष करुन आपण कर्तव्याला प्रथम प्राधान्य दिले आहे. यामुळे प्रत्येकाने अंतःकरणपूर्वक आपला सन्मान केला पाहिजे, असेही महापौर म्हणाले. शौर्य पुरस्कार मिळालेल्या सर्वांचे अभिनंदन केले. तर स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसऱ्याचे प्राण वाचविणाऱ्यांना शौर्य पदक देणे हा शौर्य पदक देण्यामागे हेतू असल्याचे महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सांगितले. तसेच त्यांच्या टिमवर्कचे योगदान सुध्दा तेवढेच महत्वपूर्ण असल्याचे ते म्हणाले. यासोबतच येणाऱ्या पिढीला प्रोत्साहन मिळावे हा हेतुसुध्दा यामागे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मागील दोन वर्षात अग्निशमन दलाचे आधुनिकीकरण करण्यावर आम्ही भर दिला असून यापुढील काळात आग लागूच नये यासाठी खबरदारीच्या उपाययोजना आम्ही करणार आहोत, असा दावा त्यांनी केला. बृहन्मुंबई महापालिकेचा अग्निशमन दलाचा देश व विदेशात एक मोठा दबदबा असून त्यांनी तो टिकवून ठेवावा यासाठी शुभेच्छा देत असून याठिकाणी अग्निशमन दल अधिकारी व कर्मचारी यांचे कुटुंबिय उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचेही अभिनंदन करीत असल्याचे ते म्हणाले. प्रमुख अग्निशमन अधिकारी प्रभात रहांगदळे यांनी आपल्या प्रास्ताविकातून कार्यक्रमाची रुपरेषा मांडली. यानंतर विविध आगीच्या घटनांमध्ये शौर्यपदक प्राप्त अधिकारी व कर्मचारी यांना महापौर व महापालिका आयुक्तांच्या हस्ते शौर्यपदक देऊन गौरविण्यात आले. यानंतर शहीद अग्निशमन अधिकारी सुधीर अमिन यांना जाहिर झालेले प्रशस्तीपत्र त्यांच्या पत्नीने मान्यवरांच्या हस्ते स्विकारले. त्यासोबतच राष्ट्रपती पदक जाहिर झालेल्या प्रमुख अग्निशमन अधिकारी प्रभात रहांगदळे, उप प्रमुख अधिकारी (तांत्रिक) राजेंद्र चौधरी, प्रमुख अग्निशमक नंदकिशोर बावळेकर, प्रमुख अग्निशमक सुधाकर तांबे यांचे मान्यवरांनी यावेळी अभिनंदन केले. कार्यक्रमाला शौर्यपदक प्राप्त अधिकारी व कर्मचारी तसेच त्यांचे कुटुंबिय मोठया संख्येने उपस्थित होते.