रत्नागिरी, प्रतिनिधी : मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासंदर्भात विरोधकांनी जी काही मुक्ताफळे उधळली ती अत्यंत दुर्दैवी असल्याचं म्हणत खा. सुनील तटकरे यांनी विरोधकांना फटकारलं आहे. ते आज रत्नागिरी जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी खासदार तटकरे खासदार सुनील तटकरे म्हणाले की, निसर्ग चक्रीवादळाच्या वेळी निकषांच्या पलीकडे जाऊन कोकण वासीयांना मदत करण्याचा प्रयत्न केला. याहीवेळी राज्य सरकारने कोकणाला झुकतं माप देत सहकार्याने मदत करावी, अशी ठाम भूमिका माझी राहणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या कोकण दौऱ्यावर टीका करणाऱ्या विरोधकांना त्यांनी यावेळी फटकरलं,
तटकरे म्हणाले की, संकटाच्या काळात सर्व एक होत असतात, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. संकटाचा मुकाबला सामुदायिक रित्या करायचा असतो, राजकारण करायचं असतं त्यावेळी करता येईल. माननीय मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्या संदर्भात जी काही मुक्ताफळे उधळली गेली ती अत्यंत दुर्दैवी आहेत, यापेक्षा अधिक मी काही बोलू इच्छित नाही. या संकटाच्या काळात टीकाटिप्पणी करण्यापेक्षा कोकणवासीयांच्या पदरी काय अधिक पडेल याचा विचार करण्याची आवश्यकता असल्याचं सांगत विरोधकांना फटकारलं.
दरम्यान पंतप्रधानांनी गुजरातला एक हजार कोटी रुपयांची मदत केली, आमची एवढीच माफक अपेक्षा आहे, की भारत सरकारने जे काही पॅकेज जाहीर केलं आहे, ते पॅकेज जसंच्या तसं तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या सर्व राज्यांना लागू केलं पाहिजे, एनडीआरएफच्या निकषांमध्ये वाढ केली पाहिजे. दरम्यान आता जे काही विरोधक टीका करताहेत, त्यांचं सरकार केंद्रात असल्यामुळे आपल्या राजकीय वजनाचा उपयोग त्या ठिकाणी करून घ्यावा अशी आपली त्यांना विनंती असल्याचा टोला खासदार सुनील तटकरे यांनी यावेळी लगावला.
भाजपा आमदार रवींद्र चव्हाण यांनी माजी मुख्य सचिव अजय मेहता यांच्यावरून मुख्यमंत्र्यांवर केलेली टीका निराधार आहे, असं काही विसंगत बोलून प्रसिद्धी मिळवण्याच्या पाठीमागे जाऊ नका, अशी त्यांना आपली विनंती असल्याचं यावेळी खासदार सुनील तटकरे म्हणाले.