रत्नागिरी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे यांनी दाखल केली. मुख्यमंत्री काल कोकण दौ-यावर आले होते. चिपळूण येथील जाहीर सभेत त्यांनी शेतकर्यांना २५ हजारांचे पॅकेज दिले जाईल, अशी घोषणा केली. हा आचारसंहितेचा भंग आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना प्रलोभन दाखवले गेले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी आणि मुख्यमंत्र्यांवर आचारसंहिता भंगाची कारवाई व्हावी अशी मागणी राणे यांनी तक्रार अर्जात केली आहे.
मुख्यमंत्री कोकणात आले असता त्यांनी शिवसेनेविरोधात एक चकारशब्द देखील उच्चारला नाही. कारण कोकणात शिवसेना-भाजपाची छुपी युती आहे. जिथे शिवसेनेची ताकद नाही तिथे भाजपने मदत करायची आणि जिथे भाजपला गरज आहे तिथे शिवसेनेने मदत करायची हे आधीच ठरलेले आहे, असा आरोप निलेश राणे यांनी केला. स्थानिक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना शिवसेनेच्या विरोधात कोकणात बोलू नका असे आधीच सांगितलं होते. त्यामुळे मुख्यमंत्री शिवसेनेच्या विरोधात बोललेच नाहीत, असाही आऱोप राणे यांनी केला.