मुखेड : तालुक्यातील शेतमजुरांच्या रोहयो काम, घरकुल, जमीन, रेशन आणि अतिवृष्टीमुळे पिकांची शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांना श्रमनुकसान भरपाई मिळणे व इतर समस्यांच्या सोडवणुकीकरिता आज दिनांक 12/08/2022 रोजी मुखेड तहसील कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात आली.
मुखेड तालुक्यात भूमिहीन मजूर आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतीतील पिकांचे अति नुकसान झाले आहे. परिणामी शेतीत शेतमजुरांसाठी काम व मजुरी मिळण्याची जि काही किमान शक्यता होती ती ही अतिवृष्टीमुळे नाहीशी झाली आहे. त्याचबरोबर शेतमजूर व अल्पभूधारक शेतकरी यांच्या वाट्याला बेरोजगारी, उपासमार आहे. कर्जाचे डोंगर चढत चालले आहे. मिळकतीची निश्चितता नाही. 2022 पर्यंत प्रत्येक भारतीयाला पक्के घर देण्याचे माननीय प्रधानमंत्री यांचे आश्वासन सत्यात उतरताना दिसत नाही. तालुक्यातील असंख्य गरिबांना घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही. घरकुल मिळाले तर बांधायला जागा नाही. ज्या जागांवर राहतो ती जागा त्यांच्या नावे लागत नाही. करायला काम नाही कसायला जमीन नाही. शासन आणि प्रशासन म्हणतय “हर घर तिरंगा” लावा. राहायला स्वतःच घर नाही. रेशन कार्ड नाही. ज्यांना रेशन कार्ड आहे त्यांना निकृष्ट अन्न मिळतंय. मुखेड शहरातील मजूर मागील दोन वर्षांपासून राज्य रोहयो अंतर्गत रोहयो चे जॉबकार्ड आणि काम मागत आहेत ते दिले जात नाही. अशा एक ना अनेक समस्यांनी मजूर व शेतकरी वर्ग घेरला गेला आहे. आणि आपण स्वातंत्र्याची 75 वे वर्षे साजरे करण्यात येत असल्याच्या या काळात शेतकरी-शेतमजूर, ग्रामीण श्रमिकांच्या मागण्या मान्य कराव्यात असे आवाहन तालुका प्रशासनाला करीत महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन (लाल बावटा) च्या वतीने तीव्र धरणे आंदोलन करण्यात आली.
ग्रामीण भागातून व मुखेड शहरातील मजुरांनी, “कसेल त्याच्या नावे जमीन द्या”, ‘भूमिहीनांना जमिनीचे वाटप करा’, ‘घरकुल योजनेत वंचीत लाभार्त्यांचा समावेश करा’, ‘वर्षानुवर्षे राहत असलेली घरे व जागा गरिबांच्या नावे करा’, ‘मागेल त्याला रोहयो अंतर्गत कामे द्या’, ‘जिल्हा परिषद मुलींची हायस्कुल मुखेड’ येथील अतिक्रमण हटवून कंपाऊंड बांधा” या घोषणांनी परिसर निनादला. आंदोलकांना नेतृवाने संबोधित केले आणि सहा सदस्यांच्या शिष्टमंडळाने पुढील मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना सादर करीत त्यावर तहसीलदार यांच्याशी मुद्देनिहाय सविस्तर चर्चा केली. चर्चेदरम्यान तहसीलदार यांनी संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना फोनवरून समस्या निवारण संबंधी सूचना व आदेश दिले.
आंदोलनातील मागण्या पुढीलप्रमाणे होत्या विविध सामाजिक सुरक्षा योजनांसाठी भरलेले प्रस्ताव मंजूर करा. जसे की, निराधार पेन्शन योजना, श्रावणबाळ पेन्शन योजना राबवा, तालुक्यातील शेतमजुरांना रोजगार हमी योजनेअंतर्गत काम द्या. वर्षभराचे रोहयोचे लेबर बजेट व कामाचा वार्षिक आराखडा तयार करण्यासाठी ग्रामपंचायतींना तसेच मुखेड नगर पालिकेस निर्देश द्या, तालुक्यातील रोहयो वरील कामाचे थकीत वेतन तात्काळ अदा करा., रोहयो च्या विहिरी, पांदण रस्ते इत्यादी कामांवर तालुक्यात जेसीबी यंत्र वापरले गेले आहेत या कामांची चौकशी करा. यंत्रांवर बंदी आणा. जेसीबी वापरून झालेल्या कामाची बिले काढू नका. संबंधीत कर्मचारी व इतर संबंधितांवर कायदेशीर कारवाई करा. मुखेड नगर परिषद कार्यालयास मागणी केलेल्या मजुरांना राज्य रोजगार हमी योजने अंतर्गत जॉबकार्डचे वाटप करा आणि मजुरांना तात्काळ रोहयोचे काम उपलब्ध करा, मुखेड शहरातील मजूर कुटुंबांची राहती जागा, कच्ची घरे त्यांच्या नावे नगर पालिका रेकॉर्डवर घ्या आणि नमुना 8 चा उतारा द्या. वंचीत लाभार्थ्यांना घरकुल योजनेत सामाउन घेण्याची मोहीम राबव, मुखेड तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा. शेतकऱ्यांना पिकांची योग्य ती नुकसान भरपाई जाहीर करा आणि शेतमजुरांना श्रमनुकसान भरपाई अदा करा, तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजना आणि इतर घरकुल योजनांमधून अनेक गरीब गरजू कुटुंब वगळल्या गेले आहेत तसेच स्थलांतर तथा विविध कारणांमुळे वंचीत राहिले आहेत; त्यांच्या समावेश घरकुल योजनांमध्ये करून तात्काळ लाभ द्या, तालुक्यातील मजुरांना रेशन कार्ड वाटप करा आणि कुटुंबातील सदस्यांचे ऑनलाइन करून नावे वाढवा. तसेच रास्त भाव दुकानांमधून निकृष्ट दर्जाचे अन्नधान्य देने बंद करून सकस, दर्जेदार अन्न धान्य पुरवठा करा, तालुक्यातील भूमिहीनांना कसण्यासाठी जमीन द्या. जमीन कसत असलेल्या गायरान धारकांच्या नावे जमीनी द्या, जिल्हा परिषद हायस्कुल (मुलींची), मुखेड या शाळेसमोर त्रासदायक अतिक्रमण हटवून. शाळेला कंपाउंड बांधा आणि मुलींच्या सुरक्षेची हमी द्या. आंदोलनाचे नेतृत्व युनियनचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड विनोद गोविंदवार,सचिव कॉ.अंकुश अंबुलगेकर,उपाध्यक्ष कॉ.माधव देशटवाड,सहसचिव कॉ.मंजुश्री कबाडे, जिल्हा समिती सदस्य कॉ.पंढरी देशटवाड,कॉ.पार्वती माळी,कॉ. रेणुका तुरेवाड यांनी केले तर आंदोलन यशस्वी करण्यासाठी कॉ.लक्ष्मण भोकासखेडे,कॉ.लक्ष्मण गिरी,कॉ.राजू वाघमारे, कॉ.शंकर येरगे, कॉ.विठ्ठल पांढरे,कॉ.माधव बादावाड सुरेश मामीलवाड,भीमराव वाघमारे,विश्वनाथ वाघमारे,ताहेराबी पठाण, चांदोबा वाघमारे यांनी परिश्रम केले.