
रत्नागिरी, (आरकेजी) : दर्जेदार मासळीसाठी देशातले दोन नंबरचे बंदर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरीतल्या मिरकरवाडा बंदरातील गाळ काढण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. फ्लोटिंग ड्रेझरद्वारे मिरकरवाड्यातील गाळ उपसा सुरु करण्यात आला असून भरती ओहटीच्या वेळा साधून सध्या गाळ उपसा करण्यास सुरवात झाली आहे.
कोकणातील एक महत्त्वाचं बंदर म्हणून मिरकरवाडा बंदर ओळखलं जातं. मात्र सध्या या बंदरात मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आहे. हायड्रोग्राफिक सर्वेनुसार मिरकरवाडा बंदरात दोन लाख ८७ क्यूबिक मीटर गाळ बंदरात साचलेला आहे. मिरकरवाडा बंदराच्या विकासासाठी फेज दोन अंतर्गत निधी मंजुर झालेला आहे. त्याचाच एक भाग म्हणून या फ्लोटिंग ड्रेझरद्वारे मिरकरवाडा बंदरातील गाळ उपसला जात आहे. मुंबईतून हा ड्रेझर रत्नागिरीच्या मिरकरवाडा बंदरात आला आहे. गाळ काढल्यानंतर बार्जद्वारे तो खोल समुद्रात टाकला जातो. काम सुरु झाल्यापासून आतापर्यंत 2500 हून अधिक क्यूबिक मीटर गाळ काढण्यात आलेला आहे. संपूर्ण गाळ काढण्यास जवळपास महिनाभराचा अवधी लागण्याची शक्यता आहे. पण हे काम पूर्ण झाल्यानंतर बंदरातील गाळाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे.