रत्नागिरी, प्रतिनिधी : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मिनी लॉकडाऊन करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानं बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र या आदेशाविरोधात स्थानिक व्यापारी आक्रमक झाले आहेत. रत्नागिरी शहरातील व्यापाऱ्यांनी आज आपली दुकानं बंद ठेवत, दुकानांसमोर निषेधाचे फलक हातात धरून या लॉकडाऊन विरोधात अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला.
अत्यावश्यक सेवा सोडून इतर दुकाने बंद ठेवण्याच्या शासनाच्या आदेशाविरोधात रत्नागिरीतील व्यापाऱ्यांचा आक्रोश आज पहायला मिळाला. रत्नागिरी व्यापारी महासंघाने या बंद विरोधात अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. रत्नागिरीतील बाजारपेठ आज बंद ठेवण्यात आली. मात्र मिनी लाॅकडाऊनमध्ये व्यापाऱ्यांची दुकाने बंद ठेवण्याच्या निर्णयाचा रत्नागिरीतील व्यापाऱ्यांनी अनोखा निषेध नोंदवला. आपलं दुकान बंद ठेवत आपल्या दुकानासमोर व्यापारी उभा राहिला. हातात निषेधाचे बोर्ड घेवून सरकारच्या दुकाने बंदचा निषेध करण्यात आला. रत्नागिरीतल्या रामआळी ते गोखले नाका परिसरात प्रत्येत दुकानासमोर साखळी करून सरकारच्या दुकान बंदच्या आदेशाचा निषेध केला गेला. अनेक दुकानदारांनी दुकानावर निषेधाचे बोर्ड झळकावले होते.
गेले वर्षभर आम्ही लॉकडाऊनचा सामना केला, अनेक संकटं आमच्यासमोर आली, मात्र आता यातून कुठे सावरत असताना पुन्हा मिनीलॉकडाऊन लादण्यात आला आहे, त्यामुळे आम्ही नेमकं करायचं काय? आमचं कुटुंब कसं चालवायचं असा सवाल यावेळी व्यापारी करत होते.