रत्नागिरी, प्रतिनिधी : मराठा आरक्षणा संदर्भात मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची घेतलेली भेट प्रिमॅच्युअर असल्याचं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्या भेटीबाबत केलं होतं. या वक्तव्याचा खासदार विनायक राऊत यांनी शेलक्या शब्दांत समाचार घेतला आहे. ते आज रत्नागिरीत बोलत होते.
यावेळी खासदार विनायक राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना पोटशूळ उठण्याचं कारण म्हणजे मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची भेट. त्यांना डावलून हे दोघे एकत्र येताहेत, त्यामुळे आपण कुठेतरी अडगळीत पडलो जाऊ, आपण कुठेतरी बाहेर फेकलो जाऊ, ही भिती त्यांच्या मनामध्ये असल्याने त्यांचा जळफळाट झालेला असल्याची टीका खासदार विनायक राऊत यांनी केली आहे.
शंका घेणाऱ्यांना शंका घेऊ दे
दरम्यान पंतप्रधान आणि मुख्यमंत्री भेटीवर बोट ठेवणाऱ्या मनसे आणि छत्रपती उदयनराजे भोसले यांनाही चोख उत्तर दिलं आहे. शंका घेणाऱ्यांना शंका घेऊदे, परंतु पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांमध्ये जी चर्चा झाली त्यातून महाराष्ट्राच्या हिताचेच प्रश्न सोडवले जातील, याबद्दल आम्हाला खात्री असल्याचं खासदार विनायक राऊत यावेळी म्हणाले.