
रत्नागिरी : मतदार जागृतीसाठी आज 200 बोटींची किनाराफेरी रत्नागिरीत काढण्यात आली. या जिल्ह्यास 167 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा आहे. या किनाऱ्यावर राहणारे हे मच्छिमार व त्यांचे परिवार यांच्या मतदानाचे प्रमाण केवळ 30 ते 40 टक्के इतके कमी आहे ते वाढून 100 टक्के व्हावे यासाठी हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला.
स्व्हीप अंतर्गत आज 200 बोटींचा समावेश असणारी आगळी किनारा फेरी आज काढण्यात आली. स्व्हीप कार्यक्रमाच्या प्रमुख असलेला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम झाला.
या कार्यक्रमास पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय आनंद पालव, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, लिड बँक व्यवस्थापक अडसूळ तसेच पर्ससीन मच्छिमार मालक असोसिएशनचे अध्यक्ष विलास सावंत, उपाध्यक्ष नासीर वाघू, सचिव जावेद होडेकर, जिल्हा मच्छिमार संघाचे अध्यक्ष सुलेमान मुल्ला, आदर्श मच्छिमार सोसायटीचे इम्रान मुकादम आदींची मुख्य उपस्थिती होती.
लोकसभा निवडणुकीत सर्व मच्छिमार बांधवानी 100 टक्के मतदान करावे असे आवाहन 46 रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा रत्नागिरी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी यावेळी केले. याला प्रतिसाद देत 18 एप्रिलनंतर मतदान होईपर्यंत एकही होडी समुद्रात जाणार नाही असा निर्णय घेत त्याच स्वरुपाचा प्रतिसाद मच्छिमारांनी दिला. या उपक्रमाच्या संकल्पनेबद्दल सीइओ गोयल यांचे मी अभिनंदन करतो असे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.
यावेळी छोटेखानी कार्यक्रमात सर्वांचे स्वागत करण्यात आले. स्वत: आंचल गोयल यांनी मच्छिमार कुटूंबातील महिलांना गुलाबपुष्प देवून त्यांच्याशी संवाद साधला व मतदानाचे आवाहन केले. त्याला सर्व महिलांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
200 बोटींचा हा काफिला त्यानंतर भगवती बंदरपर्यंत सागरफेरी करुन पुन्हा मिरकरवाडा येथे दाखला झाला. मच्छिमार बोटींवर महिला कधी जात नाहीत परंतु या बोटींच्या फेरीत एक बोट महिलांची होती हे या किनारा फेरीचे वैशिष्ट्य ठरले.
















