
रत्नागिरी, 14 June : निसर्ग चक्रीवादळात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या मच्छिमार बांधवांना सुधारित निकषानुसार जास्तीत जास्त नुकसान भरपाई शासन देईल, असे वक्तव्य राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री अस्लम शेख यांनी केले. सोबतच एलईडी मासेमारी बंदी साठी शासन कायदा आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शेख यांनी निसर्ग चक्रीवादळाने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी आज दापोली तालुक्यातील हर्णे बंदर, बाणकोट आणि केळशी या भागांना भेट देऊन तेथील मच्छिमार बांधवांशी चर्चा केली आणि नुकसानीबाबत माहिती घेतली. चक्रीवादळामुळे झालेल्या बोटींच्या नुकसानीची त्यांनी यावेळी पाहणी केली.
याबाबतचे पंचनामे करताना मच्छिमार बांधवांच्या असणाऱ्या विमा दाव्यांवर परिणाम होणार नाही अशा पद्धतीने नुकसान भरपाईचे पंचनामे करावेत अशा सूचना त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या. दापोलीचे उपविभागीय अधिकारी शरद पवार हे या दौऱ्यात त्यांच्यासमवेत होते. केळशी येथील खाडी मधल्या गाळाचा उपसा लवकरात लवकर करण्यात यावा याबाबतही त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
मच्छिमार बांधवांच्या डिझेल परताव्या बाबत शासनाने गतिमान पद्धतीने काम केले असून गेल्या पाच वर्षात थकित राहिलेली रक्कम डिसेंबर 2019 पूर्वी पर्यंतचा बॅकलॉग भरत सर्वांना अदा केली आहे असेही शेख म्हणाले. सर्व मासेमार बांधवांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे असेही त्यांनी येथील नागरिकांशी चर्चा करताना सांगितले.