मुंबई, ( विशेष प्रतिनिधी) : आरक्षण, कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी आदी प्रमुख मागण्यांसाठी सकल मराठा समाजाने प्रचंड मोठा ’मराठा क्रांती मूक मोर्चा’ राज्याची राजधान मुंबईत काढला. राज्याच्या विविध भागातून आपल्या हक्कांसाठी मराठा बांधव आणि भगिनी मुंबईत दाखल झाले होते. भायखळा येथील वीर जिजामाता उद्यानापासून शिस्तबद्धपणे सकाळी ११ वाजता मोर्चाला सुरुवात झाली. जेजे पुलावरून मोर्चा सरकू लागला.मोर्चेकर्यांची सातत्याने मोर्च्यात भर पडत होती. पण मोर्चाचे अंतीम टोक सापडत नव्हते. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेले भगवे झेंडे, काळ्या रंगाचे टी- शर्ट, डोक्यावर भगव्या टोप्या यामुळे संपूर्ण परिसर भगवा झाला होता.
आज सकाळपासूनच सकल मराठा समाजाच्या नेतृत्वाखाली हाती भगवे झेंडे घेऊन लाखो कार्यकर्ते मुंबईत धडकू लागले. त्यामुळे संपूर्ण मुंबईवर भगवी चादर पसरली होती. कार्यकर्ते मोर्चात सामील झाल्यानंतर साधारण तीन च्या सुमारास आझाद मैदानात मोर्चा पोहोचला. यानंतर त्याचे सभेत रुपांतर झाले. समाजातील मुलींनी तेथे असणार्या व्यासपीठावरून मोर्चकर्यांना संबोधीत केले. लहान मुलींनी समाजाच्या व्यथा उत्स्फूर्तपणे मांडल्या.
राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांनी दिंडी काढली. ‘आमच्या शेतकरी बापाने आत्महत्या केली. आम्ही मराठ्यांची मुले आमचा काय गुन्हा?’, आरक्षण मिळायलाच हवे, देता कि जाता, अशा आशयाचे फलक या मुलांच्या हातात होते. कोपर्डी घटनेतील बलात्काऱ्यांना फाशी देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले, त्याचे काय झाले? असा प्रश्न उपस्थित करण्यात आल्या.
मराठ्यांनी ठरवले तर पुन्हा या सरकारला निवडून आणणार नाही, असा इशारा देण्यात आला. मराठा समाजाचे शेकड्याने आमदार आहेत. परंतु, समाजाची दखल घेतली जात नाही, अशी खंत व्यक्त केली गेली.
ऍट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर केला होत आहे, असा आरोप करून या कायद्यात सुधारणा करा, अशी मागणी करण्यात आली. इतर समाजाला आरक्षण दिले, तेव्हा मराठा समाजाने विरोध केला नाही. तेव्हा आमच्यात आरक्षण मागणीला विरोध का? असा प्रश्नच विरोध करणार्यांना विचारण्यात आला.
सभेत गोंधळ
मोर्चेकऱ्यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटले. या भेटीची माहिती देण्यास संभाजीराजे यांनी सुरुवात करताच मोर्चेकऱ्यांचा एकच गोंधळ झाला. तसेच काँग्रेसचे आमदार नितेश राणे व्यासपीठावर चढताच मोर्चेकऱ्यांकडुन जोरदार घोषणाबाजी केली गेली. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर केवळ शिष्टमंडळाचे समाधान झाले; आमचे नाही. आश्वासन नको, तर लेखी हमी द्या, अशी मागणीच मोर्चेकऱ्यांनी केली. दरम्यान सकाळाच्या सुमारास भाजप आमदार आशिष शेलार यांनी आझाद मैदानात मोर्चेकर्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनाही रोषाला सामोरे जावे लागले.
ज्येष्ठ नेतेही सहभागी
राजकारण बाजूला ठेवून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री व आमदार नारायण राणे, आमदार भाई जगताप,आमदार नितेश राणे, निलेश राणे मोर्चात सहभागी झाले होते. खासदार संभाजीराजेही सुरूवातीपासूनच मोर्चात सामील झाले होते.
मुंबई महापालिकेने उपलब्ध केले मोफत उपचार
मोर्चा दरम्यान मुंबई महापालिकेने मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध केली. पाच ठिकाणी उपचार केंद्रे सुरू करण्यात आली. त्यातून चार हजार जाणंवर उपचार करण्यात आले. उन्हामुळे चक्कर येणे, अशक्तपणा आदींचा त्रास अनेकांना झाला. सेंट जॉर्ज या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी काहींना पाठवण्यात आले, अशी माहिती पालिकेने दिली.