रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी): नाणारमधल्या प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला विरोध असताना, दुसरीकडे रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड ते दाभोळ गॅस पाईपलाईन वाटद दरम्यान जमिन मोजणी व मोबदला रक्कमेसाठी पंचनाम्याची कार्यवाही सुरु झाली आहे. ग्रामस्थाचा याला तीव्र विरोध आहे. त्यामुळे जिल्ह्यात मनाई आदेश जारी करण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्हयात २६ मार्च रोजी खेड येथे झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा विटंबनाचे निषेधार्थ ठिकठिकाणी मोर्चा तसेच इतर आंदोलनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. राजापूर तालुक्यातील नाणार येथे प्रस्तावीत रिफायनरी प्रकल्प, जयगड-डिंगणी, पारंपारिक मच्छिमार व पर्ससीननेट मच्छिमार यांचेत सुरु असलेल्या मासेमारी वादाविरोधात विविध ठिकाणी आंदोलनात्मक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणासाठी भूसंपादनाचे काम चालू असून त्याकरिता देखील काही ठिकाणी ग्रामस्थांचा विरोध आहे. २९ एप्रिल २०१८ रोजी रत्नागिरी जिल्ह्यात बोध्द पोर्णिमा हा सण साजरा करण्यात येणार आहे. वरील सर्व परिस्थिती लक्षात घेता, रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्याही प्रसंगी क्षुल्लक कारणावरुन झालेल्या घटनांचे पडसाद उमटून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता जिल्ह्यात मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. त्यानुसार शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरता येतील अशी हत्यारे, सोटे, तलवारी, बंदुका, सुरे, लाठ्या अगर कोणतीही वस्तू घेवून फिरणे, अंग भाजून टाकणारा कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ घेवून फिरणे, दगड किंवा इतर शस्त्रे, हत्यारे किंवा शस्त्रे फेकावयाची साधने बरोबर घेवून फिरणे, गोळा करणे किंवा तयार करणे, सभ्यता अगर नितीमत्ता किंवा शांतता धोक्यात येईल अशी भाषणे करणे, अगर सोंग आणणे, अगर कोणतीही वस्तू किंवा जिन्नस तयार करणे व लोकांत प्रसार करणे, इसम अगर प्रेते किंवा आकृती यांच्या प्रतिमांचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक रितीने घोषणा करणे, गाणी गाणे, वाद्य वाजविणे, पाच किंवा पाचपेक्षा जास्त इसमांनी विनापरवानगी एकत्र येणे या कृत्यांना मनाई करण्यात आली आहे. सदरचे आदेश अंतयात्रा, धार्मिक विधी, धार्मिक मिरवणूक, लग्नसोहळा, सामाजिक सण, शासकीय सेवेत तैनात कर्मचारी व सार्वजनिक करमणूकीची सिनेमागृह, रंगमंच या बाबीना लागू होणार नाहीत, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. प्रतिबंधात्मक आदेशाच्या काळात कोणताही मोर्चा, मिरवणूका तसेच सभा निवडणूक प्रचार सभेचे आयोजन करावयाचे झाल्यास संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे व अशी परवानगी घेतल्यानंतरच उपरोक्त प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाही, असे रत्नागिरीचे अपर जिल्हादंडाधिकारी यांनी सांगितले.