मुंबई : प्रसिद्ध अभिनेते नसरुद्दीन शहा अभिनीत एक सिनेमा आहे. सिनेमा एका बेवारस मृतदेहाभोवती फिरतो. सिनेमात पोलिसातील संवेदनशीलपणा समोर आणला गेला आहे. बेवारस मृतदेहाबाबत पोलीस करत असलेला विचार या सिनेमात आहे. याच अनुषंगाने पाहील्यास चित्रपटासाठी वास्तववादी लिखाण होऊ शकेल, अशी घटना शाहूनगर पोलिस ठाण्यात घडली आहे. लॉकडाउनचा काळ, पोलिसांवर असलेला प्रचंड ताण, त्यात चार बेवारस मृतदेह, त्यातील एक कोरोना बाधीत आणि सर्वांवरील अंत्यसंस्कार आणि ते करणारी महिला पोलीस या सत्यता यात आहेत.
राज्याच्या कठीण काळात पोलिसाने कसे कर्तव्यदक्ष असावे, याबाबत मुंबई पोलीस दलाची मान उंचावल्याची घटना समोर आली आहे. लॉकडाउन आणि कोरोनाचा प्रादुर्भाव असताना माणूस एकमेकांसमोर जायला घाबरतो, तिथे मृतदेहाबाबत बोलायला नको. कोरोना विरोधात लढणाऱ्या अनेक पोलिसांनाही या आजाराची लागण झाली आहे. असे, गढूळ सामाजिक वातावरण असताना धारावी शाहूनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या संध्या घोसाळकर-शिलवंत यांनी एकाच दिवशी चार बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचे धैर्य दाखवले. ज्यात एक कोरोनाबाधीत होता.
संध्या यांच्याशी जेव्हा संपर्क साधला तेव्हा त्या दैनंदिन कामकाजात व्यस्त होत्या. नंतर बोलू, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.
संध्या या विक्रोळीतील कन्नमवार नगर येथे कुटुंबासह राहतात. पती, दोन मुलं, सासू-सासरे असे त्यांचे कुटुंब आहे. शाहू नगर पोलिस ठाण्यात एडीआर कारकून म्हणून कार्यरत आहेत. मृतदेहाची नोंद करणे आणि बेवारस मृतदेहाच्या नातेवाईकांचा शोध घेणे, असे संध्या यांच्या कामाचे स्वरूप आहे. नियमानुसार विशिष्ट दिवसात मृतदेहाचा दावा सांगणारे कोणीच न आल्यास त्याची विल्हेवाट लावली जाते. याबाबत परवानगी घेऊन संबंधित पोलीस ठाणी नातेवाईक म्हणून अंत्यसंस्कार करतात.
कोरोनाची भीती सर्वांना सतावतेय. संसर्ग होण्याची शक्यतेने भयग्रस्त वातावरण आहे. तरीसुद्धा संध्या यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने चारही मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. ज्यात एक कोरोना बाधित होता. “आम्ही भोईवाडा स्मशानभूमीत गेलो जेथे निर्देशानुसार सायन रुग्णालयातून कर्मचाऱ्यांनी चारही मृतदेह आणले. यानंतर अंत्यसंस्कार करण्याबाबत कार्यवाही केली गेली. अंतिम विधी होईपर्यत थांबलो.”, असे त्या म्हणल्या.
संध्या या कला शाखेतून पदवीधर आहेत. 1995 साली शिपाई म्हणून पोलीस दलात नोकरीला लागल्या. त्यांचे सासरे देखील पोलिस दलात होते.
मला माझ्या कर्तव्यासह माझ्या कुटूंबाच्या सुरक्षिततेची जाणीव आहे. माझे सासरे पोलिस खात्यात होते. पोलिसांच्या कामाविषयी ते समजतात आणि पाठिबा देतात. माझे कुटूंब माझ्या सोबत आहे, असे त्या म्हणाल्या
संध्या म्हणतात जेव्हा त्या घरी पोहचतात. त्यावेळी सेनीटायझर बाहेर ठेवलेले असते. हात स्वच्छ केल्यानंतर घरात प्रवेश करतात. जे आपल्या संरक्षणासाठी महत्त्वाचे आहे. दोन वर्षात संध्या यांनी जवळपास 20 मृतदेहावर अंत्यसंस्कार केले आहेत.
या दोन महिन्यात सकारात्मक विचार आणि योग्य खबरदारी घेत, मी माझे कर्तव्य पार पाडत आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास गंगावणे तसेच अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार मी काम करत आहे. कुटुंबाच्या सहकार्यामुळे इच्छाशक्ती अधिक प्रबळ होते आणि काम करायला नवीन ऊर्जा मिळते असे संध्या यांनी सांगितले.