मुंबई : केवळ मुंबईचा महापौरच नव्हे तर पुढील मुख्यमंत्रीही शिवसेनेचाच असणार आहे, असे आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले. मुंबई महापालिकेत शिवसेना हा प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरल्यानंतर आज सायंकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली.
तुम्ही भाजपचा पाठिंबा घेणार का? यावर त्यांनी घाई नको, महापौर निवडणुकीच्या वेळी तुम्हाला कळेलाच, असे सांगितले. तसेच सलग पाचव्यांदा शिवसेनेला मुंबई पालिकेत सगळ्यात मोठा पक्ष म्हणून संधी मिळाली, याबद्दल त्यांनी मुंबईतील नागरिकांचे आभार मानले.
भाजपने सत्ता-संपत्ती-साधनांच्या जोरावर सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला. पण, मुंबईत पहिल्या क्रमांकाचा पक्ष शिवसेनाच ठरला. आता या पुढे मी जो निर्णय घेईन ते तुमच्यासमोर मांडेन, असेही ते म्हणाले. कमी फरकाने शिवसेना काही जागा हरली. मराठी भाषिकांसोबतच अन्य भाषिकांनी देखील शिवसेनेला मते दिली. बेहरामपाड्यात तर मुस्लिमांनी देखील सेनेच्या उमेदवाराला मते दिल, त्यामुळे विजय झाला, असे ते म्हणाले.
मतदारांची याद्यांचा घोळ हे एक षडयंत्र आहे, असा आरोप त्यांनी केला. यातील दोषींवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.