कोकणवृत्तसेवा विशेष, (निसार अली) :
मुंबईतील सर्वात जुनी अशी ओळख असणारी मढ़ ते वर्सोवा फेरीबोट असुविद्यांच्या विळख्यात सापडली आहे. बदलत्या काळातही फेरी नियमित सेवा देत असली तरी प्रवाशांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. फेरीबोटीत क्षमतेच्या तिप्पट प्रवासी प्रवास करत आहेत. बोटींची क्षमता ६० ते ७० प्रवाशांची आहे, तरिही २०० प्रवाशांची ने-आण केली जात आहे. यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
वर्सोवा येथे जेट्टी नसल्याने प्रवाशांना चिखलातून ये-जा करावी लागत आहे. वर्सोवा मच्छीमार सोसायटीनेही याबाबत मौन बाळगले आहे. सुरक्षेच्या प्रश्नावरही कोणतीही पावले उचलली गेलेली नाहीत. मढ-वर्सोवा पुल झाल्यास या समस्येचे समाधान होऊ शकते. परंतू, या पुलाला विरोध केला जात आहे. बोटीतील प्रवास गर्भवती महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी त्रासदायक ठरत आहे. सोसायटी केवळ तिकिटांचे पैसे गोळा करण्यापलीकडे काहीच करत नाहीत, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.
मढ ते वर्सोवा हा २५० मीटर लांबीचा हा पूल लवकरात लवकर व्हावा, यासाठी मुनिराज पांडे नावाच्या नागरिकाने सोशल मिडियावर अभियान छेड़ल आहे. त्याला सकारात्मक प्रतिसादही मिळत आहे. पांडे यांनी पुल निर्मितीसाठी पंतप्रधान, मुख्यमंत्री, पालिका आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला आहे. पंतप्रधान कार्यालयातून त्यांना सकारात्मक उत्तर मिळाले आहे. आता पुल कधी बांधला जातोय, या प्रतिक्षेत ते आहेत.
सद्याची अवस्था
मढ येथून पहाटे चार वाजून ४५ मिनिटांनी पहिली बोट वर्सोवासाठी सुरु होते. मध्यरात्री एक वाजून पाच मिनिटांनी शेवटची बोट मढ़ ते वर्सोवा जाते. बोटींची क्षमता ६० ते ७० प्रवासी इतकी आहे. प्रत्यक्षात २०० व अधिक प्रवासी यात भरले जातात. १० ते १५ दुचाकी आणि १५ ते २० सायकलीही बोटीतून नेले जातात. दिवसाला सुमारे पन्नास ते साठ हजार प्रवासी फेरिबोटींमधून प्रवास करतात.
लांबचलांब रांगा
बोटीशिवाय पर्याय नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. पावसाळ्यात एक ते दीड किलोमीटर एवढ्या मोठ्या रांगा लागत आहेत.
येथे लक्ष द्यावे
* बोटीच्या क्षमतेच्या तिप्पट प्रवासी म्हणजे अपघाताला निमंत्रण देण्यासारख आहे
* गर्भवती महिला,विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांच्या जीवाला धोका
*अत्यावश्यक सेवा नाही.
*प्राथमिक उपचार सुविधा उपलब्ध नाही
* वर्सोवा समुद्र किनार्यावर जेट्टी नाही
प्रतिक्रिया
जीव मुठीत घेवून समुद्रातून आम्ही प्रवास करतो. प्रवासी सुरक्षेचे उपाय करणे गरजेचे आहेत – गणेश ठोंबरे, प्रवासी