रत्नागिरी (आरकेजी) : अवैध मासेमारी केल्याचा ठपका ठेवत रत्नागिरीतील साहाय्यक मत्स्य आयुक्त विभागाच्या अधिकाऱ्यांनी मिरकरवाडा, भगवतीबंदर ७ बोटींवर कारवाई केली. ही कारवाई आकसापोटी झाल्याचा आरोप करत हर्णैतील शेकडो मच्छिमारांनी सहाय्यक मत्स्य आयुक्तांना घेराव घातला. मश्चिमारांनी यावेळी प्रश्नांची सरबत्ती करत अधिकाऱ्यांना भांबावून सोडले.
रत्नागिरीतील साहाय्यक मत्स्य आयुक्त विभागाच्या अधिकार्यानी बुधवारी बुल ट्रॉलिंग तसेच विनापरवाना पर्ससीन नेटद्वारे मासेमारी करत असल्याचा ठपका ठेवत 7 बोटींवर मिरकरवाडा, भगवतीबंदर येथे कारवाई केली होती. यातल्या दोन बोटी या दापोली तालुक्यातील हर्णैमधील होत्या. मात्र किनाऱ्यावर शेकडो बोटी असूनही फक्त आमच्यावरच नवीन नियमानुसार कारवाई का करण्यात आली. आम्हाला रत्नागिरी बंदरांमध्ये येण्याचा अधिकार नाही का, असं म्हणत हर्णैतील मच्छिमार आज साहाय्यक मत्स्य आयुक्त कार्यालयावर धडकले होते. मात्र साहाय्यक मत्स्य आयुक्त साळुंखे यांची यावेळी भांबेरी उडाली. मच्छिमारांच्या प्रश्नांची त्यांना समाधानकारक उत्तरं देता आली नाहीत. त्यातच परवाना अधिकारी श्री पालव आज कार्यालयीन कामाकरिता बाहेर गेले होते. पालव साहेब आल्यावर सर्व माहिती देतील असं साळुंखे यांनी सांगितल्यावर मच्छिमारांचा पारा आणखीनच चढला. संपूर्ण कार्यालयाचा कारभार पालव साहेबच चालवतात का? असा सवाल यावेळी मच्छिमारांनी उपस्थित केला. अखेर 4 डिसेंबर रोजी सर्व प्रश्न हर्णैमध्ये बैठक घेऊन सोडवले जातील, असं आश्वासन साळुंखे यांनी दिल्यावर मच्छिमार शांत झाले.