मुंबई : माण फाउंडेशनचे कार्य म्हणजे एक चमत्कार आहे. दुष्काळग्रस्तांसाठी चारा छावण्या, महिलांसाठी बँक, रेडिओ स्टेशन आदी उपक्रम आव्हान समजून पूर्ण केले असून हे कार्य म्हणजे मोठा चमत्कार आहे. महिलांचा कष्टाला सन्मान देण्याचे काम ही संस्था करत आहे. असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.
माणदेशी महोत्सवाचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते दादर येथील रवींद्र नाट्यगृहात आज उद्घाटन झाले. यावेळी ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ, माण फाउंडेशनच्या प्रमुख चेतना सिन्हा उपस्थित होत्या. माणदेश महोत्सवाला मुंबईकरांनी भेट देऊन या संस्थेला हातभार लावावा, असे आवाहन देसाई यांनी यावेळी केले.
देसाई म्हणाले की, महिलांच्या जीवनात प्रकाश टाकण्याचे काम देखील ही संस्था करत आहे. राज्यात महिला उद्योजकांची संख्या वाढावी यासाठी शासन प्रयत्न करत आहे. सध्या ९ टक्के महिला उद्योजक आहेत. येत्या काही दिवसांत हे प्रमाण २० टक्क्यांपर्यंत वाढवण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. राज्य शासनाने कृषी कंपन्यांना मदत करण्याचे धोरण अवलंबिले आहे. या महोत्सवात कृषी कंपन्यांनी सहभाग नोंदवून शासनाच्या उपक्रमास हातभार लावल्याचे देसाई यांनी म्हटले.
माण देश फाउंडेशनच्या महिलांना उद्योग वाढवण्यासाठी पुढाकार घ्यावा, त्यांना शासनाच्यावतीने सर्व सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही यावेळी देसाई यांनी दिली. मुंबईतील नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन या संस्थेच्या कार्याला हातभार लावावा, आपण देखील या संस्थेसोबत काम करण्यास तयार असल्याचे देसाई यांनी सांगितले.
समाजसेविका सिंधुताई सपकाळ म्हणाल्या की, महिलांना संकटात खचून न जाता नव्या उमेदीने उभे राहिले पाहीजे. आपल्या दुखाःचे भांडवल न करता स्वावलंबी बनले पाहीजे.
प्रस्ताविक फाउंडेशनच्या प्रमुखो चेतना सिन्हा यांनी केले. त्या म्हणाल्या की, प्रदर्शनाचे हे तिसरे वर्ष आहे. मुंबईतील नागरिकांना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी कष्ट करून पिकवलेला शेतीमाल उपलब्ध व्हावा, यासाठी हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. शहरी भागातील नागरिक काय खातात आणि काय खावे याची जाणिव या महोत्सवातून होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या महोत्सवातून ग्रामीण भागाताली पारंपरिक कला लुप्त होई नये, त्याची शहरी भागांना ओळख व्हावी, असा महोत्सवामागचा हेतु असल्याचे चेताना सिन्हा यांनी सांगितले. दरम्यान, अशा प्रकारचे प्रदर्शन केवळ राज्यापुरते मर्यादित न राहात देशपातळीवर भरण्याचा मानस सिन्हा यांनी व्यक्त केला.
या प्रदर्शनात केरसुनी, पापड, लोणचे पासून जातावरील दळण, मातीपासून गृहपयोगी वस्तू तयार करण्यापासून ग्रामीण संस्कृतीची ओळख दाखवणारे बारा बलुतेदार सहभागी झाले आहेत. चार दिवस हे प्रदर्शन सुरू राहणार असून शेतकऱ्यांनी पिकवलेला कृषी माल या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
यावेळी डाऊ केमिकल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर शेनॉय, एक्सेचरचे सीईओ महेश झुरळे उपस्थिती होती.