सिंधुदुर्गनगरी, 3 July : कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी जिल्ह्यात सद्या ८ जुलै २०२० पर्यंत कडक लॉकडाऊनची अमंलबजावणी सुरु झाली आहे. हा लॉकडाऊन जनतेच्या हितासाठीच करण्यात येत असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील लॉकडाऊन बाबतचा व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे आढावा आज पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतला यावेळी जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षीतकुमार गेडाम, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनजंय चाकुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ महेश खलीपे, प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील उपस्थित होते.
पालकमंत्री उदय सामंत पुढे म्हणाले, कोरोनावर मात करण्यासाठी या संसर्गाची साखळी तोडणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे. सद्या जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरा होण्याचा दर 67 टक्के असून मृत्यृदर 2.2 टक्के आहे.आर.टी.पी.सी.आर लॅब मध्ये रोज सुमारे 100 स्वॉब टेस्टींग केले जातात. आतापर्यंत 229 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 154 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. यासर्वाना डिस्जार्च देण्यात आला आहे. आतापर्यंत 3967 स्वॉब टेस्टींग करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात सध्या 69 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात लॉकडाऊन केल्यामुळे ही संख्या आणखी कमी होवून जिल्हा कोरोना मुक्त होवू शकेल.
पालकमंत्री सामंत म्हणाले, नजिकच्या काळामध्ये गणपती उत्सव आला असून जिल्ह्यात मोठ्या संख्येने चाकरमानी गणपतीसाठी येणार आहेत त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे. तरी जिल्हा प्रशासनाने येणाऱ्या गणेशउत्सवाचे योग्य नियोजन करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठित करावी. त्यासंदर्भातील नियोजनाचा आराखडा तयार करावा. सदरचा आराखडा शासनास सादर करुन त्यांची मंजूरी घेण्यासाठी राज्यस्तरावर प्रयत्न केले जातील. जिल्हास्तरीय समिती गठीत करताना जिल्ह्यातील गणेश उत्सव मडळांच्या पदाधिकारी व घरगुती गणपतींच्या प्रतिनिधींचा समावेश करावा. अशा सूचना देवून पालकमंत्री उदय सामंत यांनी लालबागच्या राजा गणपती मंडळाने जो उपक्रम यावर्षी हाती घेतला आहे. त्याधर्तीवर जिल्ह्यातील गणेश मंडळांनी आरोग्य उपक्रम हाती घ्यावेत, असे आवाहन केले.
जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी यावेळी जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन सुरु केल्यापासूनच्या कार्यवाहीची माहिती दिली. तसेच जिल्ह्यामध्ये वैद्यकीय सेवांवर कोणतेही निर्बंध घातलेले नसून जिल्ह्यामध्ये औषधांची दुकाने (मेडीकल) पूर्ण वेळ सुरु ठेवण्यास परवानगी दिली असल्याचे सांगितले.
जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षीतकुमार गेडाम म्हणाले, जिल्ह्यामध्ये पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे. तसेच रात्रीची गस्तही वाढविण्यात आली आहे. जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या सर्व प्रवेशांच्या ठिकाणी नाकाबंदी करुन येणाऱ्यांची पूर्ण चौकशी करुन जिल्ह्यात प्रवेश दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.