नाशिक ग्रामीण येथे नवीन गुन्हा
मुंबई, 10 june : लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली आहेत. राज्यात सायबर संदर्भात ४६७ गुन्हे दाखल झाले असून २५५ व्यक्तींना अटक केली आहे, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिली आहे.
राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये एकूण ४६७ गुन्ह्यांची (ज्यापैकी ३० N.C आहेत) नोंद ०९ जून २०२० पर्यंत झाली आहे. त्याची प्रामुख्याने जिल्ह्यानुसार आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की आक्षेपार्ह व्हाट्सॲप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १९३ गुन्हे दाखल झाले आहेत,तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी १९० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, टिकटॉक व्हिडिओ शेअर प्रकरणी २३ गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ८ गुन्हे दाखल झाले आहेत, इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले आहेत .तर अन्य सोशल मीडियाचा (ऑडिओ क्लिप्स, युट्युब) गैरवापर केल्या प्रकरणी ४९ गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत २५५ आरोपींना अटक केली आहे. तर यापैकी १०७ आक्षेपार्ह पोस्ट्स काढण्यात यश आले आहे.
नाशिक ग्रामीण
नाशिक ग्रामीण पोलीस जिल्ह्यातील दिंडोरी पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे या विभागातील नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या १८ वर गेली आहे. सदर गुन्ह्यातील आरोपीने कोरोना महामारीला धार्मिक रंग देणाऱ्या आशयाचा मजकूर असणारी पोस्ट आपल्या फेसबुक प्रोफाईलवरून शेअर केली होती. त्यामुळे परिसरात अफवा पसरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता.
ऑनलाईन आर्थिक फसवणूक
सध्याच्या काळात सायबर भामट्यांद्वारे ऑनलाईन आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यात या परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न आपले शेजारील राष्ट्र पण करत आहे. बऱ्याच लोकांना +९२ या अंकांनी सुरु होणाऱ्या मोबाईल क्रमांकावरून कॉल येतो किंवा व्हाट्सॲप मेसेज वा एसएमएस येतो. सदर कॉलवरील व्यक्ती तुम्हाला सांगते की ‘ तुम्हाला कौन बनेगा कोरोडपती या सुप्रसिद्ध खेळामध्ये काही रकमेची पारितोषिक मिळाले आहे व ते तुमच्या खात्यामध्ये जमा करायचे आहेत व त्यासाठी तुमच्या बँक खात्याचे सर्व डिटेल्स पाहिजेत’ असे बोलून अगदी तुमच्या क्रेडिट व डेबिट कार्डांचे पिन क्रमांक पण घेतले जातात. अशाच आशयाचा संदेश तुम्हाला व्हाट्सॲप किंवा एसएमएस वर येतो व त्यात लिंक दिली असते. त्या लिंकवर क्लिक केल्यास तुम्हाला एक फॉर्म भरायला सांगितला जातो त्यामध्ये तुमचे सर्व बँक खात्याचे डिटेल्स मागितले जातात. ते सर्व भरले कि confirmation करता +९२ या अंकांनी सुरु होणाऱ्या मोबाईल क्रमांकावरून एक कॉल येतो व बोलता बोलता त्याच वेळेस येणार otp विचारला जातो, आपण जर otp दिला तर कॉल disconnect होतो व आपल्याला लक्षात येते कि आपल्याच खात्यातून काही रक्कम दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर झाली आहे.
याच गुन्ह्याचा दुसरा प्रकार म्हणजे अश्याच +९२ या अंकांनी सुरु होणाऱ्या मोबाईल क्रमांकावरून कॉल येतो. सदर कॉलवरील व्यक्ती तुम्हाला सांगते कि ” तुम्हाला lucky draw मध्ये एक ४ चाकी गाडी मिळाली आहे व तुम्ही त्याकरिता एका विशिष्ट खात्यामध्ये त्या गाडीच्या ट्रांसपोर्टटेशनचा खर्च व टोलचा खर्च म्हणून एक ठराविक रक्कम जमा करा व नंतर तुम्हाला गाडीची डिलिव्हरी दिली जाईल”. तुम्ही रक्कम भरल्यावर त्या मोबाईल क्रमांकावर परत कॉल करायचा प्रयत्न केल्यास सदर नंबर अस्तित्वात नसतो. याच गुन्ह्यांच्या काही जाहिरातींमधील मजकूर खाली दर्शविला आहे.
महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विनंती करते कि कृपया अशा +९२ या अंकांनी सुरु होणाऱ्या मोबाईल क्रमांकावरून येणारे कोणतेही फोन कॉल्स उचलू नका तसेच, अशा नंबरवरून येणाऱ्या मेसेज मधील लिंकवर क्लिक करू नका. तसेच कोणत्याही लिंकवर किंवा कोणत्याही अनोळखी व्यक्तीस आपले बँक खात्याची सर्व माहिती व डेबिट/क्रेडिट कार्ड डिटेल्स शेअर करू नका. अशा फोन कॉल्स व येणाऱ्या मेसेजने हुरळून जाऊ नका कारण लक्षात घ्या असे कधीच कोणाला कुठे लॉटरी किंवा लकी draw अचानक लागत नसतो, उलट असे मेसेज तुम्हाला येत असतील तर त्यामध्ये फसवुणुक होण्याची शक्यता आहे याचा देखील विचार करा.
जर कोणत्याही व्यक्तीस वरील नमूद मजकूर असणाऱ्या आशयाचे मेसेजेस आले तर घाबरून जाण्याचे कारण नाही, आपण आपल्या नजिकच्या पोलीस स्टेशनमध्ये या गुन्ह्याची तक्रार नोंदवा व www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर देखील याची माहिती द्यावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात येत आहे.