मुंबई । स्थळ : मुंबईचे सेशन कोर्ट…जेवणासाठी एक वकील कोर्टाच्या बाहेरच्या आवारात बसलाय… तेवढ्यात तो पाहतो…15 कावळे त्या ठिकाणी जमा झालेत…जेवणाकडे आशेने पाहताहेत…वकील ते पाहतो…स्वतः घास घेण्याअगोदर पहिला घास निसर्गात स्वच्छतेची भूमिका बजावणाऱ्या कावळ्यांना देतो…कावळे काव काव करत त्या घासांवर तुटून पडतात…लॉकडाऊनचा फटका कावळ्यांनाही बसतोय आणि आपण त्यांच्या उपयोगाला आलो…याचेच समाधान वकिलाला वाटते…
हा प्रसंग घडलाय विक्रोळीतील प्रसिद्ध वकील ऍड. दीपक पाईकराव यांच्यासोबत. मुंबई सत्र न्यायालयाबाहेर असणाऱ्या भुकेल्या कावळ्यांना स्वतःच्या ताटातील काही भाग देत ऍड. दीपक पाईकराव यांनी भूतदया दाखविली आहे.
निसर्गरक्षणात कावळा स्वच्छतादुताची भूमिका बजावतो. पडलेली घाण, मेलेला उंदीर, उकिरड्यावरील पदार्थ खातो. त्यामुळे कावळ्याचे मनुष्य जीवनात खूप महत्व आहे. लॉकडाऊन काळात हॉटेल, वडापाव गाड्या, मासोळी बाजार बंद असल्याने कावळ्यांना अन्न मिळणे मुश्किल झाले आहे. मुंबईतील ज्या भागांत कार्यालये आहेत, ती बंद आहेत. तेथील उपहारगृहात, फेरीवाल्यांच्या गाड्या यामुळे जमा होणाऱ्या कचऱ्यावर कावळ्याचे अन्न अवलंबून असतो. ते बंद असल्यामुळे कावळ्यांना अन्न मिळत नाही आहे.
दीपक हे एका कामासाठी कोर्टात आले होते. त्यांनी बाहेरून जेवण मागवले. कोर्टाच्या बाहेरच्या आवारात बसले होते. त्यावेळी सुमारे 15 कावळे जमा झाले. सुरुवातिला त्यांना समजले नाही. एकाच वेळी हे कावळे का जमा झाले हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी कावळ्यांना हटकले नाही. उलट पहिला घास आणि जेवणातील काही पदार्थ कावळ्यांना खाऊ घातला. स्वतःजवळ असलेले बिस्किट देखील खाण्यासाठी दिले.
मी कामासाठी मुबंई सेशन कोर्ट येथे आलो होतो. वेळ लागणार होता. मग ऑनलाईन जेवण मागवले. बाहेरच्या आवारात जेवणासाठी बसलो होतो. खाताना एक-दोन कावळे जमा होतात हे मी पाहिले होते. पण एवढ्या संख्यने कावळे जमा होताना प्रथमच दिसले. ते भुकेले होते. मी त्यांना जेवणातील काही भाग दिला. बिस्कीट ही त्यांना दिले. मनापासून खूप आनंद झाला. निसर्गरक्षणात त्यांचे महत्त्व खूप आहे. त्यांना हटकणार नाही असे पाईकराव म्हणाले