मुंबई : क्रांतिसिंह नाना पाटील यांचे कार्य, कर्तृत्व तरूणांना देशभक्ती व सामाजिक कार्यासाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.क्रांतिसिंह नाना पाटील मंडई तरुण उत्कर्ष भाजिपाला व्यापारी मंडळ यांच्या वतीने दादर भाजी पाला मंडई येथे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.याप्रसंगी सहकार मंत्री सुभाष देशमुख, आमदार सर्वश्री शिवाजीराव नाईक, आशिष शेलार, विलासराव जगताप, अनिल बाबर, मंडईचे अध्यक्ष शेखरराव पाटील आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, क्रांतिसिंह नाना पाटील यांनी खऱ्या अर्थाने क्रांतीची ज्योत पेटविली. त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात महत्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांनी तरुणांची एक फौज तयार करुन त्यांना सर्वप्रकारची शस्त्र हाताळण्याचे प्रशिक्षण दिले. त्यांनी समता, सर्वांना न्याय देणारे व ब्रिटीश राजवटीपेक्षा लोकांचा विश्वास प्राप्त करणारे सरकार ‘प्रतिसरकार’च्या माध्यमातून दिले. दादर येथील भाजी मंडई व्यापाऱ्यांच्या शासनाकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
प्रारंभी मुख्यमंत्री फडणवीस यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.