मुंबई, (निसार अली) : कोळी समाजाने आता “एक मच्छिमार, लाख मच्छिमार” चा असा नारा देत सरकारविरोधात संघर्ष करण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार येत्या २५ जुलै ला विधान भवनावर समाजाचा मोर्चा धडकणार आहे. सरकारने कोळी समाजाच्या विविध प्रश्नांकडे दुर्लक्ष केले, असे महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने सांगितले आहे. मोर्च्यात सामिल होण्याचे आवाहन कृती समितीने केले आहे.
पदाधिकारी लिओ कोलासो, रामकृष्ण तांडेल, किरण कोळी, अशोक नाईक, अशोक हंबिरे, ज्योती मेहेर यांच्या नेतॄत्वाखाली डहाणू (झाई ते खारेकुरान) आणि पालघर (सातपाटी ते दातीवरे) येथे झंझावाती जनजागृती यात्रा यशस्वीपणे पार पाडली. त्यांवेळी कोळी समाजाचे प्रश्न आणि मागण्यांसंबंधी जनजागृती करण्यात आली. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात्रेचे ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले. जनजागॄती मोहीम मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.